मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात इतर गोष्टींवर निर्बंध लागू केले जात असताना नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेल्या बैलगाडा शर्यतींचं काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही भागात बैलगाडा शर्यतींच्या आयोजनाचा घाट घातला जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या शर्यतींबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. शर्यती किंवा इतर कार्यक्रमांना आपण मुरड घालायला हवी, असं अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज कोरेगाव भिमा येथे जाऊन जयस्तंभाला मानवंदना दिली. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे देखील होते. यावेळी माध्यम प्रतिनिधिींनी राज्यातील वाढती रुग्णसंख्या आणि त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैलगाडा शर्यतींविषयी विचारणा केली असता अजि पवारांनी नागरिकांना आणि शर्यतींच्या आयोजकांना आवाहन केलं आहे.
दरम्यान, करोनामुळे राज्यावर आलेलं संकट मोठं असून आपण अशा कार्यक्रमांना मुरड घालायला हवी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केलं. “कुणीही व्यक्ती असली तरी, हे जगावर आलेलं मोठं संकट आहे. आपल्याला माणसाच्या जिवाशी खेळता येणार नाही. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर मुख्य सचिवांना सूचना दिल्या आहेत की सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढा. राज्याचे प्रमुख या नात्याने जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे शर्यती किंवा इतर कार्यक्रमांना आपण मुरड घालायला हवी”, असं अजित पवार म्हणाले.
“सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्टपणे सांगितलं आहे की स्पर्धा भरवा, पण त्याची परवानगी तिथल्या स्थानिक प्रशासनाने, जिल्हाधिकाऱ्यांनी द्यायला हवी. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देताना राज्य सरकारच्या पातळीवर घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते. त्यांनी ती अंमलबजावणी करावी. स्पर्धेच्या आयोजकांनी किंवा इतर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी, जे जे याबाबत काही करत आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी देतील तो निर्णय मान्य करावा”, असं अजित पवार म्हणाले.