जालना (वृत्तसंस्था) मुलबाळ व्हावे म्हणून दर गुरुवारी वारीसाठी शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या दाम्पत्याच्या कारला झालेल्या अपघात महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची भयंकर घटना मंठा तळणी रोडवरील महावीर जिनिंगजवळ २४ जून रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली होती. परंतू पोलीस तपासात अपघाताचा बनाव करून पतीनेच पत्नीचा कारमध्ये जिवंत जाळून खून केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सविता अमोल सोळंके (३३) असे मृत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे यावेळी गाडीत सवितासोबत त्यांचा पतीही होता, तो मात्र सुखरूप होता. त्यामुळे पोलिसांनी घातपातच्या दृष्टीनेही चौफेर तपास करायला सुरुवात केली होती.
अमोल गंगाधर सोळंके व त्यांची पत्नी सविता हे परतूर तालुक्यातील कन्हाळा येथील रहिवासी आहेत. त्यांचे मागील दहा वर्षांपूर्वी लग्न झालेले आहे. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे ते दर गुरुवारी वारीसाठी शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला जात होते. त्यानुसार ते गुरुवारी सकाळी शेगावला दर्शनाला गेले होते. गुरुवारी रात्री शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन घेऊन कारमधून (क्र.एम.एच. २१. ए.एक्स.७७५५) गावाकडे निघाले होते. त्यांची कार मंठा शहराजवळील हिवरखेडा पाटीजवळ आली असता पाठीमागून आलेल्या मालवाहतूक वाहनाने जोराची धडक दिली. यानंतर कारला अचानक आग लागली. याच वेळी संबंधित वाहनचालक फरार झाला. कारने मोठा पेट घेतल्याने आपल्याला काहीच करता आले नाही, असे अमोल सोळंके यांचे म्हणणे होते. त्यामुळे डोळ्यासमोर कारमध्ये पत्नीचा होरपळून मृत्यू झाला. परंतू या दुर्घटनेत अमोल यांना कुठलीही दुखापत झाली नव्हती. त्यामुळे पोलिसांना संशय आला होता.
याबाबत मृत विवाहितेचा भाऊ बळीराम जाधव (स्वामी विवेकानंद नगर, माजलगाव, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मागील तेरा वर्षापासून बहिण सविता हिला मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून तसेच वेळोवेळी घटस्फोट दे, असे म्हणून पाटील अमोल साळुंखे हा शिवीगाळ व मारहाण करून शारिरीक व मानसिक त्रास देत होता. अनेकदा त्याने पत्नीला घटस्फोट देण्याची मागणी केली. परंतु पत्नी घटस्फोट देण्यास नकार देत असल्यामुळेच टायने राग मनात धरून पत्नीला कारमध्ये जिवंत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे. याबाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’ ने दिले आहे.
तर तक्रारीनंतर पोलिसांनी अमोलविरोधात गुन्हा दाखल करत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी अमोल साळुंके यांची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या पत्नीच्या हत्येची कबुली दिली. अमोलने पोलिसांना सांगितले की, लग्न होऊन 15 वर्षे झाल्यानंतर ही पत्नीला मूल होत नव्हते. त्यामुळे देवदर्शनाला जाण्याचा बहाणा केला. त्यानंतर देवदर्शनाहून रात्रीच्या सुमारास घरी परत येत असताना आपल्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे मंठा तालुक्यातील तळणी फाट्यावर रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली. त्यानंतर गाडीमध्ये ज्वलंत पदार्थ टाकला. त्यानंतर गाडीचे सेंटर लॉक करून पत्नीला जिवंत जाळले, असे ‘साम’टीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.