बोदवड (महेंद्र पाटील) : तालुक्यातील मनूर खुर्द गावाजवळ असलेल्या पुलाचे बांधकाम रखडल्याने ऐन पावसाळ्यात गावकऱ्यांचे हाल होत आहेत. हे काम मंजूर झाल्यानंतर काम सुरू करणे आधी गावातील लोकांचे मागणीनुसार थोडे आराखड्यात बदल करण्यात आले. त्यामुळे हे काम उशिरा सुरू झाले.
मागील वर्षी या पुलाचे बांधकामास सुरुवात झाली. मात्र, संथ गतीने होणाऱ्या कामामुळे गावकऱ्यांना अडचण होत आहे. पावसाळ्यामुळे या नाल्यात कायम पाणी साठून राहते. पर्यायी रस्त्यावरसुद्धा पाणी येत असल्याने हा रस्ता फक्त पायी चालणाऱ्या लोकांना उपयोगाचा राहिला आहे. या नाल्यात सुमारे चार ते पाच किलोमीटर पासून मनूर बु।। गावातील दोन नाल्यांचे पाणी येत असल्याने पाऊस आल्यास हा रस्ता वापरास बंद होतो. त्यामुळे या गावातील लोकांना मनूर बु।।,किंवा चिखली गावच्या रस्त्याने तीन की.मी.फेरा घालून वापरावे लागते. पावसाळा सुरू झाल्या पासून तसाही हा रस्ता ट्रॅकटर ट्रॉली ,चारचाकी गाड्यांसाठी वापरता येणे शक्य होत नाही आहे. या रखडलेल्या कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे बोदवड कार्यालयात विचारणा केली असता सध्या रेती उपलब्ध नसल्याने काम थांबले असल्याचे उत्तर मिळाले. तसेच संबंधित ठेकेदारास काम करण्याच्या सूचना दिल्या असून लवकर काम सुरू करून पूर्ण केले जाईल असे सांगण्यात आले.