मुंबई (वृत्तसंस्था) सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या ‘फुलप्रुफ’तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते सतत बेताल विधाने करीत असून, त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
भाजपला सत्ता गेल्याचे नैराश्य होतेच. सतत तारखा देऊन महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नसल्याने हतबलताही आलेली होती. वरून मराठा आरक्षणाबाबत भाजपने केलेल्या खोट्या दाव्यांचा सर्वोच्च न्यायालयानेच भंडाफोड केल्याने चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. या प्रचंड ताणतणावामुळे नेमके काय बोलावे, हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी अपेक्षा असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.
चंद्रकांत पाटलांना मराठा आरक्षण कायद्यातील काय कळतंय? ते काहीही चुकीची माहिती देत असतात, या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं, असा दमच चंद्रकांत पाटलांनी भरला आहे. मीडियाशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारवर बोट दाखवू नये. त्यांनी स्वत: राज्यासाठी काही तरी करून दाखवावं. चव्हाणांनी औकातीत राहावे. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही काय करावं ते आम्हाला सांगू नये, असं पाटील म्हणाले.