धरणगाव (प्रतिनिधी) स्थानिक राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा शहरातील नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून सतावणारी पाणी समस्या मार्गी लावण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता ही समस्या थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरबारात मांडण्यात येणार असल्याची घोषणा आज धरणगाव जागृत जनमंचने केलीय. पाणी समस्या सोडविण्यासाठी कुणीही प्रयत्न करीत नाहीत. उलट राजकारणासाठी हा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला आहे. या बाबत आज दि. ०१ ऑगस्ट रोजी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत बैठक घेत धरणगाव जागृत जनमंचची स्थापना केली. दरम्यान, लवकरच एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन धरणगावच्या पाणी समस्येचा इतिहास मांडणार आहे.
जळगाव जिल्हा जागृत जनमंच हे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कार्यरत असून सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी फळी या जनमंच शी जुळलेली आहे. त्याच धरतीवर जळगाव जिल्हा जागृत जनमंच चे शिवराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव शहरातील प्रमुख प्रश्न असलेला पाण्याचा प्रश्न कश्या प्रकारे सोडविण्यात येईल, यासह शहरातील नागरिकांच्या इतर समस्या विचारात घेवून धरणगाव जागृत जनमंचची स्थापना करण्यात आली आहे.
आज आयोजित बैठकीत जनमंचच्या वतीने धरणगाव शहराचा पाणी प्रश्न थेट मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मांडणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी आपल्या समस्या जनमंचकडे मांडाव्यात जेणेकरून सर्वांचे एकत्रित प्रश्न सोडविण्यासाठी जनमंच कार्य करेल आणि या जनमंचची प्रमुख जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जितेंद्र महाजन यांच्याकडे असणार आहे. येणाऱ्या कालावधीत प्रत्येक महिन्याला मासिक सभेच्या आयोजनाद्वारे जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार असून याद्वारे नागरिकांच्या समस्या विचारात घेवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शासनाच्या नियमांचे पालन करून, कायदेशीर मार्गाने व सनदशीर मार्गाने मंच कार्य करणार असल्याने धरणगाव शहरातील प्रत्येक नागरिक यात सहभागी होवू शकतो. गैर राजकीय संघटन असल्याने कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आम्ही स्वागत करतो व सर्वांच्या सूचनांचा आदर करतो, असेही शिवराम पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
सदर बैठकीस कोणत्याही नागरिकांना बोलाविण्यात आलेले नव्हते. फक्त सोशल मीडियाद्वारे आवाहन केल्यानुसार शहरातील जागृत नागरिकांनी बैठकीत स्वेच्छेने सहभाग नोंदविला. यावेळी जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील, धरणगाव जागृत जनमंचचे जितेंद्र महाजन, माजी सैनिक ईश्वर मोरे, राकेश वाघ, आबासाहेब वाघ, विनायक महाजन, विजयकुमार शुक्ला, दिनेश महाजन, धनराज पाटील, सुधाकर मोरे, कमलाकर पाटील, चेतन पाटील, जयेश चौधरी, प्रवीण भावसार, डी.पी.बडगुजर, स्वप्नील जैन, श्याम धनगर, कन्हैया पाटील यांच्यासह आदी नागरिक उपस्थित होते. यावेळी पत्रकार बांधवही उपस्थित होते.