मुंबई (वृत्तसंस्था) परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचं आवाहन केलं. तसेच परब यांनी आंदोलन करणाऱ्या कामगारांना पाठिंबा दर्शवणाऱ्या भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. ‘पडळकर, खोत कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार का?’ असा सवाल अनिल परब यांनी केला आहे.
त्यांनी म्हटलं की, कारवाई करण्याची इच्छा नाही. संप मागे घ्या, हा संप कोर्टाने बेकायदेशीर ठरवला आहे. काही राजकीय पक्ष पोळी भाजून घेत आहेत. पडळकर व खोत कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहेत का? जर कामावर नसतील तर पगारही होणार नाही. संप सुरू राहिल्यास कामगारांची अडचण वाढेल, असंही परब म्हणाले.
त्यांनी म्हटलं की, विलिनीकरणाची मागणी एक दोन दिवसांत होणार नाही. सरकार कुठेही कमी पडलेले नाही. कोर्टाला आम्ही लेखी दिले आहे. हा मुद्दा राजकीय पक्षांनी लावून धरलेला आहे. भाजप खतपाणी घालतंय. कामगारांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. निलंबनाची कारवाई वाट पाहूनच केली. घाईत केलेली नाही. कामगारांनी कमिटीसमोर म्हणणं मांडावं. सर्व खाजगी बसचालकांना स्टेज कॅरिजची परवानगी दिलीय, असंही परब म्हणाले.
परब म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाचं आम्ही पालन केलंय. एसटी कर्मचाऱ्यांनीही पालन करावं. लोकांना वेठीस धरु नये. कुणी भडकवत असेल तर त्यांना बळी पडू नका. मागण्या चर्चा करुन पूर्ण करु असं आश्वासन दिलं होतं. हा संप बेकायदेशीर आहे. पुन्हा विनंती आहे की, आपण कामावर यावं. कामगारांच्या नुकसानीला जबाबदार हे भाजप नेते असतील. विलिनीकरण करण्याची मागणी एक दोन दिवसात पूर्ण होणारी नाही, त्रिसदस्यीय समिती आपला अहवाल १२ आठवड्यात देणार आहे. आपण कामावर या, चर्चेतून मार्ग काढू, असं आवाहन देखील अनिल परब यांनी केलं आहे.