जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा हा हॉट सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. अगदी मार्च महिन्यापासूनच जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे जाते. मात्र, यंदा एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यानंतर जळगाव जिल्ह्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे तापमानाचा पारा घसरला होता. परंतू गेल्या दोन दिवसांपासून जळगावात तापमानाचा पारा ४२ अंशांवर आला असून, उन्हाच्या चटक्यांनी जळगावकर हैराण झाले आहेत.
एप्रिल महिन्यात ४२ ते ४३, तर मे महिन्यात कमाल तापमानाचा पारा ४५ अंशांपर्यंत पोहोचतो. मात्र, यंदाचे वर्ष अपवाद ठरले. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ४० अंशांवर तापमान गेलेच नाही. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा आकाश निरभ्र होऊन एप्रिल महिन्याचा मध्यान्हात तापमान ४३ अंशांपर्यंत गेले होते. पुन्हा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात बदल होऊन वादळी वारे, गारपीट व अवकाळी पावसाने जिल्ह्यात थैमान घातले. त्यामुळे ४३ अंशांपर्यंत पोहोचलेला तापमानाचा पारा ३५ अंशांपर्यंत खाली घसरला. मार्च व एप्रिल महिन्यात जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या तब्बल ४९८ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. परंतू आता परंतू गेल्या दोन दिवसांपासून जळगावात तापमानाचा पारा ४२ अंशांवर आला असून, उन्हाच्या चटक्यांनी जळगावकर हैराण झाले आहेत.विशेष म्हणजे पुढील चार दिवसांत पारा ४६ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.