मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनलॉकच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हळूहळू अर्थव्यवस्था सुरू झाली मात्र शाळा आणि महाविद्यालय बंदच होती. ऑनलाइन पद्धतीनं राज्यात शिक्षण दिलं जात आहे. शाळा कधी सुरू होणार याबाबत प्रश्न आणि चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्यात शाळा आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. येत्या २३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात एसओपी तयार करण्यात आला असून त्याबाबत केवळ मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी मिळणं बाकी आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात एसओपी देखील तयार करण्यात आला आहे. कशा पद्धतीनं शाळा सुरू करण्याचं नियोजन असेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. एसओपी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर इयत्ता 10वी 12 वीच्या परीक्षा मे महिन्यातच होतील अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्याआधी पालकांची परवानगी देखील घेतली जाणार आहे. यासंदर्भात पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याबाबत नियोजन करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहे.