पुणे (वृत्तसंस्था) भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केलेत. तसेच विश्वास पाटील यांना पोलीस दलाच्या नोकरीतून मुक्त करा, अशी मागणी केलीय. जालना साखर कारखान्याच्या शेअर होल्डरमध्ये रुपाली विश्वास नांगरे-पाटील यांचे नाव असल्याचे ते म्हणाले.
सोमय्या म्हणाले, ‘जालना साखर कारखान्याच्या शेअर होल्डरमध्ये रुपाली विश्वास नांगरे-पाटील यांचे नाव आहे. त्यामुळे मुंबईचे जॉईंट कमिशनर असलेल्या विश्वास नांगरे-पाटील यांनी हा बेनामी कारखाना विकत घेतला, असा माझा दावा आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करा आणि तोपर्यंत विश्वास नांगरे पाटलांना पोलीस दलातून मुक्त करा. नांगरे-पाटलांचे सासरे मुळे हे देखील शेअर होल्डर आहेत.’
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यातील मंत्र्यांवर टीका करताना सोमय्या म्हणाले, ‘महाराष्ट्रात नटसम्राट एकच होता, पण ते पद आता यांना द्यावं लागेल, बहीण नाही तर अजित पवारांनी आपल्या आईच्या नावे बेनामी इस्टेट जमा केली आहे. तसेच भावना गवळी यांनी सरकारचे ४४ कोटी ढापले, आनंदराव अडसूळ यांनी १०० कोटींचा घोटाळा केला. त्यासाठी त्यांना नोटीस दिल्या गेल्या. यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार काहीच का बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्नीच्या नावे १९ बंगले बांधले आहेत. खासदार संजय राऊत यांनी बेनामी ५५ लाख परत करून माफी मागितली आहे. जालना सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरण उघडकीस आले आहे. या कारखान्याचे मालक अर्जुन खोतकरच असल्याचे पुरावे आहेत.’