कोलकाता (वृत्तसंस्था) भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय आणि त्यांचा मुलगा शुभ्रांशु रॉय यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. अशा प्रकारे रॉय पिता-पुत्र एक वर्तुळ पूर्ण करत आपल्या मूळ पक्षात परतलेत. त्यामुळे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर आता पुन्हा एकदा भाजपाला मोठा झटका बसला आहे.
तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मुकुल रॉय यांनी, ”मी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत भाजपामध्ये कुणीही राहू शकत नाही.” असं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तर, मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमध्ये भविष्यात महत्वाची भूमिका निभवातली, असं म्हणत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालची सत्ता तिसऱ्यांदा ममता बॅनर्जींच्या हाती आल्यानंतर अवघ्या काही दिवसातच भाजपावासी झालेले पूर्वाश्रमीचे तृणमूल काँग्रेसचे नेते स्वगृही परतणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामध्ये मुकुल रॉय यांचे नाव आघाडीवर होते. तसेच, रजीब बंदोपाध्याय यांच्यासह विधानसभेच्या माजी उपाध्यक्षा सोनाली गुहा यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
ममता बॅनर्जी यांनीही मुकुल रॉय यांचं पक्षात पुन्हा एकदा स्वागत केलंय. रॉय यांना भविष्यात पक्षात कोणत्या पदाची जबाबदारी देण्यात येईल? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ‘आगामी काळात मुकुल रॉय पक्षात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतील. पूर्वी ते ज्या भूमिकेत दिसले होते, त्याच भूमिकेत ते पुन्हा एकदा दिसतील. तृणमूल काँग्रेस एका कुटुंबाप्रमाणे आहे’, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय.
मुकुल रॉय हे टीएमसी सोडणारे सर्वात पहिले नेता होते. पक्षविरोधी कारवायाच्या ठपका ठेवत तृणमूल काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी बाहेर केले होते. टीएमसीमध्ये असताना मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नेते मानले जात होते. त्यांनी टीएमसी सोडत भाजपात प्रवेश केला होता. १९९८ पासून ते बंगालच्या राजकारणात आहेत.