मुंबई (वृत्तसंस्था) शिवसैनिकांसाठी विचाराचं सोनं लुटण्याचा दिवस म्हणजेच शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा यंदा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे कुटुंबावर हल्ले करणारा असा मायचा पूत जन्माला आलेला नाही. त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांसह विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. आपल्या सगळ्यांचे एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस असतो. शस्त्रपूजन झाल्यानंतर मी माझ्या खऱ्या शस्त्रांची पूजा केली. आपल्यावर फुलं उधळली. ही माझी खरे शस्त्र आहेत. हे आशीर्वाद घेत असताना माझ्या मनात नेहमी नम्र भावना असते. प्रत्येक जन्मी हेच आई-वडील, माझा कुटुंब-परिवार हाच मिळायला पाहिजे आणि महाराष्ट्रात जन्म व्हायला पाहिजे. मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं वाटायला हवं, अशी इच्छा ईश्वरचरणी करतोय. कारण मी पुन्हा येईन म्हणत होते, ते बोलत आहेत मी गेलोच नाही, बसं तिकडेच. पण जे संस्कार आणि संस्कृती असते ती हीच असते. पदं आणि सत्ता काय आहेत? पदं येतील जातील. पण कधीही अहमपणा कधी डोक्यात येऊ देऊ नको. ज्यादिवशी डोक्यात हवा जाईल, त्यादिवशी तू संपलास, अशी माझ्या वडील आणि आजोबांची शिकवण आहे, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.
मी जनतेशी नेहमी नम्र राहत असतो. आशीर्वाद घेत असतो. हाच आशीर्वाद तर ताकद आहे. हे मागून कुणाला मिळत नाही. हे खरं वैभव आणि ऐश्वर्य आहे. हे जोरजबरदस्तीने मिळत नाही. ती कमवण्याची परंपरा मिळालेली आहे. मला काही गोष्टीचं नवल वाटतं, आजसुद्धा मी काय बोलणार कोणाचा समाचार घेणार, कोणाचे वाभाडे काढणार, बऱ्याच दिवसांनी बोलतोय, एकतर मनामध्ये विषयांची गर्दी झालीय. पण पंचायत अशीय की कोरोनामध्ये गर्दी झालीय. बरं गर्दीमध्ये दोन लसी घेतल्यात कारे बाबा? असं विचारु शकत नाही, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.