मुंबई (वृत्तसंस्था) भाजपने जर इतिहास चाळला तर, भाजपला कळेल की, शुद्ध भगवा कोणाचा आहे. आमचा भगवा हा शिवरायांचा आहे. तो शुद्ध आहे. साध्य भाजपाही भगव्याच्या प्रेमात पडली आहे. मात्र त्यांचं हे भगवा प्रेम केवळ सत्तेसाठी आहे. त्यांचा भगवा भेसळयुक्त असल्याने मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकवायचा हे जनताच ठरवेल.
मुंबईत भाजपचा भेसळयुक्त झेंडा नाही तर शिवसेनेचा शुद्ध शिवरायांचा भगवा फडकेल, असे म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसंच मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवसेनेचा सर्वात मोठा गड अर्थात मुंबई महापालिकेसाठी भाजपने ‘मिशन मुंबई’ सुरु केलं आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होणार आहे. परंतु भाजप आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. याबाबत बुधवारी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात मुंबई भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेवर निशाणा साधला. सोबतच मुंबई महापालिकेवर शुद्ध भगवा फडकवणारच असा निर्धार व्यक्त केला. याविषयी विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे त्यांनी अशी भूमिका घेणं त्यांच्या पक्षासाठी योग्य आहे. मुंबई महापालिकेवर सध्या फडकणारा भगवा शुद्ध नाही आणि ते घेऊन येणारा भगवा शुद्ध आहे, असं भाजपला वाटत असेल तर त्याचा निर्णय जनता घेईल. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. मुंबईवर आलेल्या संकटाच्या वेळी मुंबईतील मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे. रक्त सांडणाऱ्यांमध्ये शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यांना मुंबईवर शुद्ध भगवा फडकवायचा आहे त्यांनी हा इतिहास चाळावा. आमच्यासाठी एकच भगवा आहे जो शिवरायांचा आहे.
“मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा घाट सुरु आहे. भाजपची सत्ता आल्यास हे नक्कीच होईल,” असा दावाही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. सध्या ट्विटरयोध्ये शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत कोणाचे हिंदुत्व खरे आहे, हे जनताच ठरवेल, असेही राऊत म्हणाले.