मुक्ताईनगर (प्रतिनिधी) पंतप्रधान शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत राज्यभरात पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा असून विद्याथ्यांच्या जीवाशी खेळण्याच्या या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे गटनेते आ. एकनाथराव खडसे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तसेच अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांकडे केली आहे. या आहारामध्ये कुजलेल्या अळ्या, किडे व खडे असल्याचा आरोप करत त्यांनी आज मुक्ताईनगर शहरातील विविध शाळेमध्ये भेट देऊन प्रत्यक्षपणे पाहणी करत संबंधित विभाग व ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राज्यभरात शालेय पोषण आहार अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील पहिले ते पाचवी वा प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक (कॅलरी) आणि १२ ग्रॅम प्रोटीन युक्त दुपारचे मध्यान्ह भोजन तसेच सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक कॅलरी आणि २० ग्रॅम प्रोटीन युक्त आहार देण्याच्या चांगल्या हेतूने ही योजना राबविण्यात येते. मात्र यामध्ये तांदुळ, चना, मसूरडाळ वाटाणा व मठ तसेच तूर डाळ कंत्राटदारामार्फत पुरविण्यात येत असतात. मात्र मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात अत्यंत निकृष्ट दर्जाचा कुजलेल्या अळ्या किडे व खड़े असलेला पोषण आहार कंत्राटद्वारा मार्फत पुरवण्यात येत असल्याचे आ. खडसे यांनी निवेदनात म्हटले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक शाळांना आपण स्वतः भेटी दिल्या. त्यावेळी बटाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात किडे आढळून आले. तसेच वटाण्याचे पीठ पडत असून सर्वच वटाणे असल्याचेही खडसे यांनी म्हटले आहे. वर्षानुवर्षांपासून याविषयी आपल्याकडे अनेक शैक्षणिक संस्था बाबत तक्रारी येत आहेत, इतका निकृष्ट दर्जाचा हा आहार असूनही यास चान्यापासून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार बनवण्यात येत आहे. याद्वारे विद्यायांच्या जीवाशी खेळण्यात येत आहे. भावी पिढी व देशाचे भविष्य कुमकुवत करण्याचा हा प्रयत्न होत आहे.