धरणगाव (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना पाणी टंचाई, वाढलेले घाणीचे साम्राज्यासह विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर करोनाची दुसरी लाट येण्याची भीती कायम असतांना धरणगाव मुख्याधिकारी जनार्दन पवार हे हप्त्यातून दोनच दिवस येत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक राहिलेला नाही. त्यामुळे धरणगावच्या मुख्याधिकाऱ्यांकडून जिल्हा प्रशासन अधिकारीपदाचा पदभार काढून त्यांना पूर्ववत धरणगाव नगरपालिकेत पूर्णवेळ देण्यात यावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे एका निवेदान्द्वारे दिली आहे.
जितेंद्र महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाल्याने जवळपास २०-२५ दिवस नागरिकांना पाणी पुरवठा झालेला नसल्याने शहरास टॅकरद्वारा पाणी पुरावठा करण्यात आला होता. पाणी पुरवठ्याची समस्या हि नित्याचीच आहे. सध्या देखील १२-१५ दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढलेले आहे. मुख्याधिकारी हे हप्त्यातून दोनच दिवस येत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने शहरात नागरिकांना मुलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता देखील प्रशासनाने व्यक्त केली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे कळविले आहे. अशा परिस्थितीत गेल्या सहा महिन्यांपासून धरणगावचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांना जिल्हा प्रशासन अधिकारीपदी प्रभारी नियुक्ती देण्यात आली आहे. तरी धरणगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना पूर्ववत धरणगाव नगरपालिकेत पूर्णवेळ देण्यात यावे. तसेच जिल्हा प्रशासन अधिकारी पदी नवीन नियुक्ती देण्यात यावी. अथवा इतर नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांची त्याठिकाणी नियुक्ती देण्यात यावी, असे म्हटले आहे.