बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील मनूर बु येथील जि प मराठी शाळेत शिक्षण घेतलेल्या शेतकरीपुत्राने चिकाटीने अभ्यास करत वर्ग १ चे अधिकारी पद मिळवले आहे. रवींद्र पाटील हा तालुक्यात राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून वर्ग १ चा अधिकारी होणारा पहिला व्यक्ती ठरला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्याने ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
मनूर बु येथील अल्पभूधारक शेतकरी दिलीप काशीनाथ पाटील यांचा मुलगा रवींद्र पाटील याने महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या कृषी विभागाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले असून त्याची उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
रवींद्रने या परीक्षेत सातवा तर इतर मागास प्रवर्गातून दुसरा क्रमांक मिळवला आहे.शालेय जीवनापासून अभ्यासात चांगली प्रगती असलेल्या रवींद्रचे गावातील जि प मराठी शाळेत पहिली ते चौथी पुढे गावातीलच कै.अमजित चंदू पाटील माध्यमिक विद्यालयातून दहावी पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. बारावी बोदवड येथील न.ह. रांका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून उत्तीर्ण त्यानंतर के.के.वाघ कृषि महाविद्यालयातून बीएससी केली व सध्या एमएससी (कीटकशास्त्र) च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.
या पदाची जाहिरात २०२१ ला निघाली होती. पहिली परीक्षा एप्रिल २०२२ला झाली तर मुख्य परीक्षा १ आक्टो. होऊन १३ एप्रिल रोजी मुलाखत झाली. या आधीही २०२२ मध्ये रवींद्र आयबीपीएल परीक्षेत तज्ञ बैंक अधिकारी स्केल १ ही परीक्षा उत्तीर्ण झाला होता. मात्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळेल याची खात्री असल्याने त्याने ही नोकरी स्वीकारली नाही. रवींद्रचे वडील घरची शेती व मजुरी करत पदवीधर झाले. परंतू संधी न मिळाल्याने शेती सोबत खाजगी प्रतिष्ठानांतून नोकरी करत दोनही मुलांचे शिक्षण केले.
एक मुलगा इंजिनिअर असून तो बजाज कंपनीत कार्यरत आहेत. तर आईसुद्धा घरच्या शेतीत राबून संसारास हातभार लावत आहे. आई वडिलां व कुटुंबियांचा पाठींबा यामुळे आपल्याला हे यश मिळवण्यासाठी मदत झाली, अशी भावना रवींद्रने व्यक्त केली. त्याच्या या यशामुळे मनूर गावातील गावकऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.