धरणगाव (प्रतिनिधी) मागील अनेक वर्षापासून शहरातील पाणी समस्या कायम आहे. अनेक निवडणुका पाणी समस्येवर लढल्या गेल्यात. पण अद्यापही धरणगावकर तहानलेलेच आहे. धरणगावातील पाणी समस्या सोडवण्यासाठी धरणगाव जन जागृत मंचची स्थापना होत असून सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील आणि जितेंद्र महाजन हे मैदानात उतरले आहेत. अगदी शिवराम पाटील यांनी धरणगावची पाणी समस्या पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यासह मुख्यमंत्री आणि राज्यपालांपर्यंत पोहचवली जाईल, अशा आशयाची एक पोस्ट सोशल मीडियात टाकून खळबळ उडवून दिली आहे.
सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांची पोस्ट जशीच्या तशी
झिम झिम पाणी दे !
पाणी हे जिवनाश्यक आहे. दैनंदिन वापर होतो आणि म्हणूनच अन्न व आरोग्य इतकेच पाणीपुरवठ्याला सरकारने महत्त्व दिले आहे. म्हणून स्वतंत्र पाणीपुरवठा खाते बनवले आहे. पाणी पुरवठ्यासाठी कधीही पैसा कमी पडू न देण्याचे सरकारचे धोरण आहे. धरण बांधून, बोअरवेल करून, विहीरी खोदून,नदीवरून, तलाव बांधून अशा अनेक प्रकारे पाणीपुरवठा केला जातो. तरीही शक्य होत नसेल तर टँकरने,रेल्वेने पाणी पुरवठा केला जातो. तरीही धरणगाव शहर वंचित का?. जवळच अंजनी,गिरणा, तापी नदी भरभरून वाहते आणि धरणगाव कोरडे कसे, काय?. करणे असतील? याचा शोध घेणे आवश्यक आहे.
धरणगाव फक्त सत्तर हजारंचे गाव. कारखाना नाही. पाणीवर उद्योग नाही. तरीसुद्धा पाण्याची कमी का?. सरकारकडे पैसा नाही का?.पैसा असून नियोजन नाही का?.नियोजन फेल गेले का?. ईच्छाशक्ती नाही का?.लोक जागृत नाहीत का?. मागणी योग्य ठिकाणी पोहचत नाही का?. यापैकी किंवा आणखी काही कारणे असतीलच. ती कारणे शोधण्यास प्रस्थापित नेते व नगरपालिका अपयशी ठरलेली आहे का? असा संशय नागरिकांमध्ये बळावतो आहे.
आम्हाला असे वाटते की, पाण्याची मागणी योग्य ठिकाणी पोहचलीच नाही. म्हणून कोणी दखल घेतली नसावी. पाणीचा प्रश्न नगरपालिका,जिल्हा,मंत्री इथंपर्यंत पोहचली. पण उपयोग झाला नाही. म्हणून ही मागणी मुख्यमंत्री व राज्यपालांपर्यंत पोहचली पाहिजे. प्रधानमंत्री, राष्ट्रपतीपर्यंत पोहचवली पाहिजे. जर नगरपालिका, आमदार, मंत्री, जिल्हा नियोजन हे एकाच हाती असेल तर दुसऱ्या तिसऱ्याला तेथे शिरकाव करण्याचा, हस्तक्षेप करण्याचा आधिकार नसतो. आधिकार लोकशाही किंवा वैधानिक असला तरी वाव नसतो. म्हणून जेथे आधिकार चिरडला जात असेल तेथे वारंवार अपील करण्यापेक्षा जेथे ऐकले जाईल, विचार होईल, पुरवठा होईल तेथे पोहचवला पाहिजे. लोकशाही शासन प्रणालीमध्ये असे अनेक स्तर आहेत. तिथंपर्यंत आम्ही पोहचतच नाही. कारणे आहेत. जे समोर दिसते तेच सरकार समोर दिसते. तोच देव समजून आम्ही तेथेच थांबतो. आणि त्या देवालाही तेच हवे असते. आगे पिछे, उपर निचे हमारी सरकार. हम है यहांके राजकुमार…खबरदार !
धरणगाव शहरात बुद्धिमान, शिक्षीत लोकांची संख्या खूप मोठी आहे. पण दगदग न सोसवणाऱ्यांचीही संख्या खूप मोठी आहे. विरोधकांची तर त्यापेक्षा जास्त. आपण बुद्धिमान व शिक्षीत लोकांना सोबत घेऊन विरोधकांना वळसा घेऊन योग्य ठिकाणी मागणी पोहचवणार आहोत. लोकशाहीच्या सात स्तरांवर एकतरी स्तरावर पाण्याची मागणीची दखल घेतली जाईल, असा आमचा विश्वास आहे. जर शेवटच्या स्तरावरही दखल घेतली गेली नाही. तर आम्ही पावसाळ्यात पडणारे देवाचे पाणी जेवणाच्या ताटात झेलून तहान भागवू.
झिम झिम पाणी दे !
आमची तहान भागू दे !
– शिवराम पाटील
9270963122
महाराष्ट्र जागृत जनमंच