नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचे धक्कादायक विधान हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.
सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त विधानात पुढे म्हणाले की, मी आमदारासोबतच एक शिक्षकही आहे. या घटना केवळ चांगल्या संस्कारांनीच रोखल्या जाऊ शकतात. शासन आणि तलवार त्यांना रोखू शकत नाही. आपल्या मुलींवर संस्कार करणं हा सर्वांचा धर्म आहे. माझा धर्म आहे, सरकारचा धर्म आहे. कुटुंबाचाही हा धर्म आहे. जिथे सरकारचा धर्म संरक्षण करण्याचा आहे. तिथे मुलांना संस्कार देणं हा कुटुंबांचा धर्म आहे. सरकार आणि संस्कार मिळून देशाला सुंदर रुप देऊ शकतात. दरम्यान, आपल्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी एका युवतीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर तिच्यावर हल्लाही झाला. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. योगी सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे.