नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी कोणाचाही मृत्यू झाला नाही, असे मंगळवारी संसदेत विरोधी पक्षांने विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या या अजब उत्तरावर आता मोठ्या प्रमाणावर टीका सुरु झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी रुग्ण रस्त्यांवर आणि रुग्णालयात मृत पावले का? असा प्रश्न काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाला विचारला होता. त्यावर उत्तर देताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी या प्रश्नाला लिखित स्वरुपात उत्तर देताना सांगितले की, आरोग्य हा राज्यांच्या अख्यत्यारितील विषय आहे. केंद्राने सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये झालेल्या मृतांच्या आकडेवारीची माहिती देण्यासाठी सांगितले होते. त्यामध्ये ऑक्सिजनच्या अभावी रुग्ण मृत पावला असे कोणत्याही राज्याच्या आणि केंद्र शासित प्रदेशाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं नाही. ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू झाला नाही या केंद्र सरकारच्या उत्तरावर विरोधी पक्षांनी सडकून टीका सुरु झाली आहे.