जळगाव (प्रतिनिधी) सर्वोच्च व उच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमणे तातडीने काढण्याचे आदेश दिले आहे. जळगाव जिल्ह्यात ४० हजारांवर अतिक्रमण आहेत. त्यामुळे राज्य सरकारने न्यायालयात याप्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करून अतिक्रमित घरमालकांना दिलासा द्यावा, असे पत्र आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांना या कारवाईचा कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगतले आहे. जळगाव जिल्ह्यात ४० हजारांवर अतिक्रमणे गायरान जमिनीवर आहे. या कारवाईमुळे राज्यभरात हजारो नागरिक बेघर झाली होती. महाराष्ट्रातील जवळपास अडीच ते तीन लाख घरांची अतिक्रमणे काढण्याबाबत कळवले आहे. आयुष्यभराची कमाई खर्च करून गरिबांनी घरे बांधली आहेत. अतिक्रमण काढल्याने राज्यात १५ ते २० लाख लोक बेघर होतील. त्यांचे पुनर्वसन प्रशासनाला शक्य होणार नाही. गायरान जागांचे प्रयोजन आणि वापर याबाबतची पडताळणी आवश्यक असल्याचे एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, अतिक्रमण काढण्याच्या आदेशामुळे जनतेत असंतोष पसरला आहे. त्यांच्या मनात बेघर होण्याची भीती निर्माण झालेली आहे. ही कारवाई झाल्यास राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे खडसे म्हणाले.