जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेत सुमारे १२०० कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथकाने आज पुन्हा पाच महत्वपूर्ण व्यक्तींचे जबाब घेतले. दरम्यान, आज नेमके कोणा-कोणाचे जबाब घेतले याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या वतीने कमालीची गोपनियता बाळगण्यात आली. दरम्यान, पुण्याच्या पथकाने याआधी सहा जबाब घेतले होते. त्यानुसार शुक्रवारपासून तर आत्तापर्यंत अकरा जणांचे सविस्तर जबाब आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नोंदविले आहेत.
मागील पाच दिवसापसून आर्थिक गुन्हे शाखाचे (पुणे) दोन अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांचे पथक जळगावात ठाण मांडून आहे. या पथकाने दोन स्वतंत्र टीम तयार केल्या. एका टीमने तहसिल कार्यालयाच्या आवारातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी केली. तर दुसऱ्या एका टीमने जळगाव शहरातील सहा जणांचे सविस्त जबाब घेतले. यात बीएचआरच्या मालमत्तांची बेकायदेशीरपणे खरेदी-विक्री करणाऱ्यांचा समावेश आहे. त्यानुसार आत्तापर्यंत अकरा जणांचे सविस्तर जबाब आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले आहेत. आज जबाब घेतलेल्या व्यक्तींमध्ये काही महत्वाच्या लोकांचा समावेश असल्यामुळे पोलिसांकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली. त्यामुळे आज जबाब घेण्यात लोकांमध्ये कुणाचा समावेश आहे. याबाबत चर्चेला उधान आले आहे. दरम्यान, बीएचआरच्या एमआयडीसीतील मुख्य शाखेतून दोन ट्रक भरुन संगणक, कागदपत्र जप्त करण्यात आले आहेत. याच कागदपत्रांच्या आधारावर बीएचआरच्या घोटाळ्याचे पुरावे पोलिसांनी शोधुन काढले आहेत.















