जळगाव (प्रतिनिधी) भडगाव तालुक्यासह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत करणेबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांना मदत देण्याकरिता मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत दि. ११ जून २०१९ रोजी वादळी पावसामुळे भडगावसह रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, जळगाव व पाचोरा या तालुक्यातील शेतपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी अनुदान मिळणेबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रस्ताव सादर केला.
या प्रस्तावाच्या अनुषंगाने ३.२५ कोटी रुपये अनुदान मंजूर करणेबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एकूण ३८५६ बाधित शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली आहे.