शहादा(प्रतिनिधी) दिनांक 3 सप्टेंबर 2022. येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग व महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग तसेच विद्यार्थी विकास विभागातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘अध्ययन अध्यापन प्रक्रिया 2.0’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे समन्वयक मा. श्री. संजयजी राजपूत सर, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. ए. एन. पाटील, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. कैलास चौधरी, प्रा. डॉ. मंजुषा अहिरराव, महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. व्ही. यु. बर्फे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. डी. वाय. पाटील, प्रा. मालिनी अढाव, प्रा. डॉ. एस. बी. पाटील मंचावर उपस्थित होते. भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व कार्यशाळेचे उद्घाटक सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे समन्वयक मा. श्री. संजयजी राजपूत सर आपल्या मार्गदर्शनपर वक्तव्यात म्हणाले की, शिक्षण हे अमृता सारखे आहे. शिक्षण रुपी अमृत सेवनाने अभ्यासकाला अमरत्व प्राप्त होत असते. त्या दृष्टीने आजची कार्यशाळा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. काळानुरूप शिक्षण क्षेत्रात अनेक बदल येत आहेत. त्या बदलांना स्वीकारून निरंतर पुढे जायला हवे. ग्रंथालयाच्या माध्यमाने आपल्याला अक्षर व शब्द यात्रेच्या अनुभव येतो. हा अनुभव जीवन वारीसाठी अत्यंत उपयोगाचे असल्याचे नमूद करत त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील नव्या बदलांना सामोरे जाण्याचे आवाहन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. ए. एन. पाटील विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, ग्रंथालय हे खऱ्या अर्थाने चालते बोलते विद्यापीठ आहे. त्यातील विविध विषयांवरील पुस्तके ही खरी मार्गदर्शक असतात. कुठल्याही विद्यार्थी वा व्यक्तीची जडणघडण ही ग्रंथालयाच्या माध्यमानेच होत असते. जीवनरुपी सागरात टायटॅनिक रूपी जहाजातून मार्गक्रमण करत असताना शिक्षण रुपी लाईफ बोट अत्यंत उपयोगी ठरते. याप्रसंगी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तंत्रस्नेही होण्याचा मंत्र त्यांनी यावेळी दिला.
या कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे मार्गदर्शक नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित शिक्षण शास्त्र महाविद्यालयात कार्यरत प्रा. डॉ. कैलास चौधरी आपल्या ‘आजची अध्ययन अध्यापन प्रक्रिया : ई – लर्निंग’ या विषयावर बोलताना म्हणाले की, मित्रांनो, अध्ययन आणि अध्यापन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आधुनिक विकास हा मानवी संसाधनांवर अवलंबून असतो. पण लोकसंख्या किती यापेक्षा तिच्या दर्जा, गुणवत्ता व कार्यक्षमता फार महत्त्वाची ठरते. ग्रंथालयात मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणण्याची शक्ती आहे. इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला आपल्या संस्कृतीचाही अभ्यास करायला हवा. आज व पुढे येणाऱ्या काळात ई – लर्निंग शिक्षण प्रणालीचाच बोलबाला राहणार आहे. माध्यमांच्या योग्य वापर करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना ई – लर्निंग प्रक्रिये संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्राच्या मार्गदर्शिका कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शिरपूर येथील ग्रंथपालिका प्रा. डॉ. मंजुषा अहिरराव आपल्या ‘ई – संसाधनांचे आजच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील महत्त्व’ या विषयाशी निगडित अभ्यासा संबंधात म्हणाल्या की, वर्तमान काळात ई – लर्निंग व्यवस्थेपासून लांब राहणे अशक्य आहे. आज ई – लर्निंग ची अनेकानेक व्यासपीठे शिक्षणाची कवाडे उघडी ठेवून आपली वाट पाहत आहेत. ही शिक्षण व्यवस्था सर्वांसाठी कधीही, केव्हाही, कुठेही सहजी उपलब्ध आहे. ही व्यवस्था विनामूल्य शिक्षण सेवा देण्यास तत्पर आहे. शिक्षणाच्या या अव्याहतपणे वाहणाऱ्या ज्ञानगंगेत न्हावून निघत आपण आपली ज्ञान झोळी भरून घेतली पाहिजे. ई – लर्निंग व्यवस्थेमुळे ज्ञानाची भूक भागवणे अत्यंत सोपे झाले आहे. वेळ व पैशांची बचत करणारी ही शिक्षण गंगोत्री येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. या प्रक्रियेमुळे हवे तसे शिक्षण घेता येण्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना कुठल्याही मुद्द्याच्या सखोल – संदर्भयुक्त अभ्यास करण्याचा सल्ला दिला.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष प्रो. डॉ. संतोषकुमार पाटील याप्रसंगी आपले निरीक्षण नोंदवतांना म्हणाले की, अध्ययन म्हणजे स्वतः शिकणे. जे ई – लर्निंग मुळे प्रत्येकाच्या आवाक्यात आले आहे. या निरंतर चालणाऱ्या ई – शिक्षण प्रवाहात संयम फार महत्वाच्या आहे. जागतिक तंत्रज्ञानाच्या युगात घरबसल्या काम व दाम ही संकल्पना रूढ होत आहे. आज जगाच्या संकल्पना बदलत आहेत. या बदलत्या संकल्पना व घडामोडींसोबत आपल्यालाही बदलायला हवे. मित्रांनो, निरंतर प्रयत्न करणाऱ्यांची झोळी कधी रीती राहणार नाही. असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना ही – शिक्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनोजकुमार गायकवाड यांनी वाचन संस्कृती कमकुवत होत चालल्याची खंत व्यक्त करत सांगितले की सामाजिक समरसता साधण्यासाठी ग्रंथालय सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. आज सर्वत्र डिजिटल जगाची अनेक रुपे पुढे येत असतांना समाजात परस्पर सहकार्याची भावना व एकोपा कसा टिकून राहील याकडेही लक्ष पुरवण्याची नितांत गरज आहे. या सर्व ई – लर्निंग प्रक्रियेत मानव समाज व या समाजातील मुख्य घटक मनुष्य हा फार महत्त्वाचा भाग आहे. शिक्षण व्यवस्थेत अनेक बदल येत आहेत. आपल्याला याचे साक्षीदार होता आले पाहिजे. म्हणून स्वतःला अद्ययावत ठेवण्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या नव्याने येऊ घातलेल्या अभ्यास क्रेडिट बँकेचीही ओळख करून दिली.
तंत्रस्नेही व्यक्तिमत्व व प्राणीशास्त्र विभागात कार्यरत प्रा. डॉ. साहेबराव ईशी यांनी यू ट्युब या चॅनेल वरून या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण करुन महत्वाची भूमिका बजावली. यासाठी सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. बी. पाटील, प्रस्तावना प्रा. डॉ. व्ही. यु. बर्फे तर आभार प्रकटन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले. या कार्यशाळेत सर्व प्राध्यापक व जिल्हयाभरातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











