गडचिरोली (वृत्तसंस्था) कापसाच्या शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला चढवून तिला जागीच ठार केल्याची घटना रविवारी (७ जानेवारी) सकाळच्या सुमारास घडली. सुषमा देवदास मंडल (५०, रा. चितलपेठ, ता. अहेरी) असे मृतक महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
सुषमा मंडल या मुलचेरा तालुक्यातील मथुरानगर येथील रहिवासी असून मागील १५ ते २० वर्षांपासून चिंतलपेठ येथे स्थायिक झाल्या. घरी किराणा दुकान असून त्या ठिकाणी शेतीसुद्धा करतात. दरम्यान रविवारी सकाळच्या सुमारास शेतात कापूस वेचणी करताना अचानक वाघाने झडप घेऊन त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्या जागीच ठार झाल्या असून मंडल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मडावी आपल्या पथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
मागील काही दिवसांपासून मुलचेरा तालुक्यातील विविध भागात वाघाचे दर्शन होत आहे. या अगोदर मुलचेरा तालुक्यात वाघाने पाळीव प्राण्यांवर हल्ला करून ठार केले होते. काही दिवसांपूर्वी कोठारी ते कोपरअली रस्त्यावरील मल्लेराजवळ काही लोकांना वाघाचे दर्शन झाले होते..