अहिल्यानगर (प्रतिनिधी) कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीतील उत्साह विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी केले. त्या पक्षाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थापनेला पंचवीस वर्ष पुर्ण झाले. त्यानिमित्ताने पक्षाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. पक्षातर्फे अहिल्यानगर (अहमदनगर) येथे”रौप्य महोत्सवी राष्ट्रवादी” या मुख्य कार्यक्रमाचे पक्षाचे अध्यक्ष खा .शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पक्ष स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले. या पंचवीस वर्षात शरद पवार यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली पक्षाने अनेक चढ उतार बघितले. त्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते साक्षीदार आहात. त्याबद्दल सर्वांचे आणि लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांचे रोहिणीताई खडसे यांनी अभिनंदन केले.
पुढे संवाद साधताना त्या म्हणाल्या, ही लोकसभा निवडणुक पक्षासाठी अत्यंत महत्वाची होती या निवडणुकीत सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेले नियोजन, घेतलेली जबाबदारी आणि घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर पक्षाला घवघवीत यश मिळून पक्षाचे दहा पैकी आठ खासदार निवडून आले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि आभार. पंचवीस वर्षाच्या काळात अनेक चढउतार सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अनुभवले परंतु या वेळची निवडणूक वेगळी होती. सर्व आपल्या हरण्याची वाट बघत होते परंतु असे म्हणतात जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा प्रत्येक जण तुमच्या हरण्याची वाट बघत असतो आणि आपण जो विजय मिळवला आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि हा तुमच्या प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीने मिळाला आहे.
सर्वांचे लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते तेथे सुप्रियाताई या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या. ताईंनी मतदारसंघात केलेले विकास कामे आणि मतदारसंघातील लोकांसोबत असलेला त्यांचा जनसंपर्क यामुळे ताई एक लाख अठ्ठावन हजार मतांच्या भरघोस लिडने निवडून आल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान काही लोकांनी सुप्रियाताईंवर खालच्या स्तरावर जाऊन टिका केली परंतु ताईंनी संयम बाळगला ताईंच्या या संयमाला मी सलाम करते. ताईंसाठी दोन शब्द बोलते, सब सितम वाले बहोत कमजोर समजे ते जिसे,उसने इस गुलशन मे हंगामा माचाकर रखं दिया सारे तुफान चुप रहे सारी आंधिया बैठी रही, और एक तितली ने दरखतो को हिला के रख दिया, अशा सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या पुरोगामी विचारसरणीत आम्ही काम करतो याचा अभिमान असल्याचे रोहिणीताई खडसे यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १०६ प्रचार सभा घेतल्या हे सोपे नव्हते शरद पवार साहेबांनी एकेका दिवशी चार ते पाच सभा घेतल्या हे सोपे नव्हते, शरद पवार साहेबांच्या तब्बेतीवर काही लोक टिका करायचे त्यांच्यापेक्षा जास्त प्रचार सभा मेळावे घेऊन साहेबांनी दाखवून दिले वय नाही हिंमत आणि जिद्द लागते त्या जिद्दीच्या जोरावर आपण लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.
लोकसभा निवडणुकीतील हा उत्साह आपल्याला अजून तीन महिने विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवायचा आहे हाच उत्साह घेऊन जे गद्दार आपल्याला सोडून गेले किंवा ज्यांनी गद्दारी केली त्यांना आपल्याला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवून त्यांना जमिनीवर आणायचे आहे महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माता भगिनींनी प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन हि निवडणूक महिलांनी बदलली आणि महिलांनीच या बदलामध्ये सहभाग घेतला आहे त्याबद्दल सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांचे रोहिणीताई खडसे यांनी अभिनंदन करूनआभार व्यक्त केले.
यावेळी पक्षाच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया ताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, माजी मंत्री आ.अनिल देशमुख, आ.राजेश टोपे, आ.जितेंद्र आव्हाड, आ.रोहित पवार, खा.अमोल कोल्हे, खा.निलेश लंके, खा.बजरंग सोनवणे, खा.अमर काळे, खा.धैर्यशील मोहिते, खा.बाळ्यामामा म्हात्रे, खा.भास्कर भगरे आणि पक्षाचे सर्व खासदार,आमदार, सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, नेते , पदाधिकारी , कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.