मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली (Mumbai Police sent notice to Devendra Fadnavis) आहे. देवेंद्र फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या या नोटीसवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, नोटीस देणं अशी परिस्थिती आपल्या देशात कधीच नव्हती. वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणं असं नव्हतं.
पुण्यात आज अजित पवारांचे ३१ ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. सूस भागात एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर त्यांना प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. अजित पवारांनी कार्यक्रमानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सर्वच राजकीय पक्षांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला आहे. फडणवीसांना आलेल्या नोटिशीविरोधात भाजपा आंदोलन करणार असल्याबाबत विचारणा करताच अजित पवारांनी भूमिका मांडली आहे. “प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. नोटीश कशामुळे दिली? माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीने वागावं. देशात, राज्यात आपल्याकडे अशी परिस्थिती कधीच नव्हती…नोटिसा देणं, वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणं वगैरे. मी पंतप्रधानांसमोर देखील त्याबाबत वक्तव्य केलंय. प्रत्येकानं आपापलं काम करावं. जनतेनं ज्यांना पाठिंबा दिला आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं असं माझं मत आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “यशवंतराव चव्हाणांनी जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीने कसं वागलं पाहिजे, हे दाखवून दिलं आहे”, असं देखील ते यावेळी म्हणाले.