जळगाव (प्रतिनिधी) बहुजन कल्याण विभागाच्या ६ सप्टेंबर, २०१९ च्या शासन निर्णयान्वये धनगर समाजातील पात्र महिला उद्योजकांसाठी स्टॅण्ड अप इंडिया योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ धनगर समाजातील पात्र महिला उद्योजकांना देण्यात येणार आहे.
धनगर समाजातील महिला नवउद्योजकांनी एकूण प्रकल्प किंमतीच्या १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर १५ टक्के रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येईल. धनगर महिला उद्योजकांनी अर्जासोबत उद्योग आधार नोंदणीपत्र, जात प्रमाणपत्र व बॅकेचे कर्ज मंजूरीचे पत्र जोडणे आवश्यक आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील महिला उद्योजकांना आवाहन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ८ मार्च, २०१९ च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील पात्र महिला उद्योजकांसाठीही स्टॅण्ड अप इंडिया योजना सुरु करण्यात आली आहे. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील महिला नवउद्योजक यांनी एकूण प्रकल्प किंमतीच्या १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर १५ टक्के रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.
या अटींची पूर्तता करीत असलेल्या महिला उद्योजकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांचे कार्यालयाकडे संपर्क साधावा. असे आवाहन योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.