मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीचे उत्तर न दिल्यास या आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांची कार्यालयेदेखील फोडण्यात येत आहेत. शिवसैनिकांची हीच आक्रमकता लक्षात घेऊन राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून ठिकठिकाणी सुरुक्षा वाढवण्यात आली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे ४० बंडखोर आमदार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत. एवढेच नव्हे तर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश असलेला शिवसेनेचा नवा गट स्थापन केल्याचे बोलले जात आहे.
या सर्व घडामोडी घडत असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावलीय. या नोटिशीचे उत्तर न दिल्यास या आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते. या १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. याच मागणीची दखल घेत झिरवळ यांनी ही नोटीस बजावली असून त्यांना ४८ तासांचे अल्टिमेटम दिले आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील बंडखोर आमदार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.