जळगाव (प्रतिनिधी) मी कोणताही गुन्हा केलेला नसताना माझ्या एवढ्या चौकश्या होऊ शकतात. तो राजकीय विषय नव्हता तर आता बीएचआर प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी विरोधकांना टोला लगावला.
बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात होत असलेली कारवाई ही राजकीय हेतूने केली जात आहे, असे नाही. या प्रकरणात कोणाची नावे आहेत, याची मला माहिती नाही. परंतु, या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले आहे. एकनाथ खडसे हे नुकतेच मुंबईहून जळगावात परतले. शुक्रवारी सकाळी ते आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खडसेंनी मत मांडले. बीएचआर प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीचे खडसेंनी स्वागत केले आहे.
एकनाथ खडसे यांनी यावेळी बोलताना आपल्या विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. ते म्हणाले ‘ बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात हजारो ठेवीदारांचा पैसा असुरक्षित झाला. त्यामुळे हजारो संसार उद्ध्वस्त झाले. आता या गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. त्यामुळे हा काही राजकीय विषय नाही. तो ठेवीदारांच्या संरक्षणाचा विषय आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शासन होईलच, मग तो लहान असो किंवा मोठा असो… माझी यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आयकर विभाग, लोकायुक्त, दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी झाली आहे. आता सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून देखील चौकशी सुरू आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नसताना माझ्या एवढ्या चौकश्या होऊ शकतात. तो राजकीय विषय नव्हता तर आता बीएचआर प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो? अशा शब्दात खडसे यांनी विरोधकांना टोला लगावला.