मुंबई (वृत्तसंस्था) बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या, त्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना आता सहा गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याचं निदर्शनात आलं होतं. त्यानंतर याबाबतील बोर्डाने (HSC Board) मोठा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाल्याचे समोर आले होते. या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
तीन प्रश्नांसाठी एकूण सहा गुण देण्यात येणार
21 फेब्रुवारीला बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर होता. या इंग्रजीच्या पेपरमध्ये कविता विभागातील (Portry Section) प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. इंग्रजीच्या पेपरमधील तीन प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. या तीन प्रश्नांसाठी सहा गुण होते. आता बोर्डाने इंग्रजी पेपरमधील चुका मान्य करत विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बोर्डाकडून विद्यार्थ्यांना ‘त्या’ तीन प्रश्नांसाठी एकूण सहा गुण देण्यात येणार आहेत. बोर्डाकडून निर्णय देत सांगितलं आहे की, बारावीच्या इंग्रजी पेपरमधील चुकलेले तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना सहा गुण देण्यात येतील. इंग्रजी पेपरमध्ये चुका आढळल्यानंतर त्याबाबतीत बोर्डाने अहवाल जारी करण्यास सांगितलं होतं. यामध्ये काही तज्ज्ञांची बैठक झाली. बोर्डाने दिलेल्या अहवालामध्ये इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याचं बोर्डाने मान्य केलं आहे. तीन प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या.
गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही !
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी १०.३० नंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात १०.३० वाजेपर्यंत व दुपार सत्रात दु. २.३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
संबंधित घटनेबाबत सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात फिर्याद क्र. ००३७ अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे श्रीमती ओक यांनी स्पष्ट केले आहे.