मुंबई (वृत्तसंस्था) पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी आता १० ऑक्टोबरला होणार आहे.
गोरेगाव येथील पत्रा चाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक केली होती. संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, आजही न्यायालयाकडून संजय राऊत यांना दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली. तसेच, राऊतांच्या जामीन अर्जावरही पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होईल, हे न्यायालयाने स्पष्ट केले. महिनाभराहून अधिक काळ संजय राऊत कोठडीत आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. ईडीच्या म्हणण्यानुसार, म्हाडाचा भूखंड असलेली पत्राचाळ विकसित करण्याचे काम प्रवीण संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. मात्र, प्रवीण राऊत यांनी पत्राचाळीतील रहिवाशांची फसवणूक करून काही भूखंड खासगी विकासकाला विकला. म्हाडा व भाडेकरूंच्या तोंडाला पाने पुसत प्रवीण राऊत यांनी भूखंडाचे अनेक भाग खासगी विकासकांना हस्तांतरित केले. तर स्वतःचे २५ टक्के शेअर्स एचडीआयएलला विकले. ईडीच्या म्हणण्यानुसार, या व्यवहारातील काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा झाली आहे.