जळगाव (प्रतिनिधी) सध्या राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे दहा जिल्ह्यात 350 गावात 1319 वाड्यामध्ये 369 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भविष्यातील पावसाची स्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा विभागाने टंचाईग्रस्त गावात व संभाव्य टंचाई निर्माण होणाऱ्या गावात पाणीपुरवठा विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे मिशन मोडवर सुरू करा असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले
टंचाई कालावधीत करावयाच्या उपाययोजना बाबतीत आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली. त्यावेळी ना. गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा,जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अधिक्षक अभियंता अजय सिंह, जलजीवन मिशनचे 10 जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. तसेच 10 जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृष्टी प्रणाली द्वारे उपस्थित होते.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, राज्यात 10 जिल्ह्यात टँकर सुरू आहे या जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांनी तेथील लोकप्रतिनिधीसोबत आढावा बैठक घेऊन पुढील टंचाई संदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात नियोजन करावे. तसेच येणाऱ्या आगामी काळात पर्जन्यमान कमी असल्यामुळे पाणी जपून वापरावे असे आवाहन स्थानिक नागरिकांना करावे.
पाणी वाटपाचे योग्य ते नियोजन करावे जेणेकरून पुढील टंचाई कालावधीत पाण्याची उपलब्धता होईल असे पाहावे .भविष्यात लागणाऱ्या टँकर साठी पाणी उपलब्ध होईल असे नियोजन करावे. टंचाई सदृश गावात जलजीवन मिशन व अन्य पाणीपुरवठा योजनाच्या कामाचा आढावा घेऊन त्या पूर्ण पूर्ण करण्याच्या दृष्टीने तात्काळ नियोजन करण्याचे निर्देश श्री पाटील यांनी यावेळी दिले .
राज्यात नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना आणि बुलढाणा या 10 जिल्ह्यात सध्या 350 गावात 1319 वाड्यामध्ये 369 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
















