चोपडा (प्रतिनिधी) : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मानसमित्र समुपदेशन केंद्र आणि मानसशास्त्र विभाग यांच्या वतीने ‘जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच कै.मा.अक्कासो. सौ.शरश्चचंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे तर उदघाटक म्हणून उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपस्थित होते. याप्रसंगी सौ. एम. टी. शिंदे, मार्गदर्शक श्री.संदीप बी.देवरे तसेच मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर.आर.पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मानसमित्र समुपदेशन केंद्राचे समन्वयक डॉ.आर.आर. पाटील म्हणाले की, ‘मानसिक ताणतणाव, चिंता, नैराश्य, उदासीनता, स्मृतिभ्रंश, उन्माद अशा विविध प्रकारच्या मानसिक समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी व लोकांमध्ये मानसिक आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ साजरा केला जातो.’
यावेळी श्री. संदीप बी.देवरे ‘पालकांचे मानसिक आरोग्य:महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींची भूमिका’ या विषयावर बोलतांना म्हणाले की, ‘सध्याच्या धावपळीच्या जीवनात मानसिक आरोग्य टिकविणे महत्वाचे आहे. शारीरिक दृष्ट्या निरोगी राहणे,सकारात्मक सबंधांची निर्मिती करणे, जीवनातील ताणतणावांना सामोरे जाणे, आपल्या कुटुंबातील व्यक्तीसाठी योगदान देणे, त्यांना सामावून घेणे, आपल्यातील क्षमता लक्षात घेणे व उत्पादनक्षम काम करणे यासाठी मानसिक आरोग्य महत्त्वाचे असते. मानसिक दृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तींना योग्य वेळी मार्गदर्शन करणे व समजून घेणे गरजेचे असते. शारीरिक आजारांचे मूळ मानसिक कारणांमध्ये असते. पालकांचे आरोग्य जोपासण्यासाठी पोषण आहार, जीवनशैली, व्यायाम, योगा, ध्यानधारणा, कलेची जोपासना, संगीत ऐकणे, नृत्य करणे, भावविरेचन इत्यादी पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.
अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य श्री.एन. एस. कोल्हे म्हणाले की, ‘मानसिक आरोग्याविषयी माहिती करून घेणे गरजेचे आहे. खंबीर मन व शांत बुद्धी असायला हवी.मानसिक चिंतेपासून दूर राहून मानसिक आरोग्य टिकवून ठेवणे काळाची गरज आहे.
या कार्यक्रमाचे आभार चमेली पाटील हीने मानले तर सूत्रसंचालन भैरवी माळी व माहेश्वरी धनगर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानसशास्त्र विभाग व मानसमित्र समुपदेशन केंद्राचे विद्यार्थी तसेच डॉ.ए.बी.सूर्यवंशी, डॉ. एम.एल.भुसारे, श्री. डी.डी.कर्दपवार, सौ.एस.बी. पाटील, श्री.अमित न्हायदे,पूजा पून्नासे, श्री.बी.एच.देवरे श्री. संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.