नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताचं अद्यापही कोरोनाशी युद्ध सुरू असून आपण हे युद्ध लढणार आणि जिंकणारही असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. गेल्या १०० वर्षानंतर आलेली ही महामारी जगाची परीक्षा घेत आहे. या संकटात आपण अनेक जवळच्या लोकांना गमावले आहे. कोरोना रुग्णांचं दु:ख मी समजू शकतो. आपली एका अदृश्य शक्तीसोबत लढाई सुरू आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील साडे नऊ कोटींहून अधिक शेतकर्यांना ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ अंतर्गत आठवा हप्ता प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील साडे नऊ कोटी शेतकऱ्यांना १९,००० कोटी रुपयांची रक्कम प्रदान केली, यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांनी देशातील कोरोना परिस्थितीवरही भाष्य केलं. भारत पराभूत होणारं राष्ट्र नाही. भारत आणि कोणताही भारतीय धैर्य गमावणार नाही. आम्ही नक्कीच लढू आणि जिंकू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
देशभरातील शासकीय रुग्णालयांत मोफत लसीकरण सुरू आहे. त्यामुळे जेव्हा तुमचा क्रमांक येईल तेव्हा लस नक्की घ्या. लस आपल्याला कोरोनापासून संरक्षण प्रदान करू शकेल आणि गंभीर आजाराचा धोका कमी होईल. कोरोना लस हे कोरोनाविरूद्ध संरक्षणाचं एक महत्त्वाचं साधन आहे. देशभरात जलद गतीनं लसीकरण पूर्ण व्हावं यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकार एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत देशभरात जवळपास १८ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. जवळपास १०० वर्षांनंतर अनुभवायला मिळालेली हा साथीचा आजार जगाची परीक्षा घेत आहे. आपल्या समोर एक अदृश्य शत्रू आहे. आपण सगळ्यांनी आपल्या अनेक जवळच्या व्यक्ती गमावल्या आहे. गेल्या वर्षभरात देशवासियांनी ज्या प्रकारचं दु:ख सहन केलंय त्या दु:खाचा त्रास मलाही होतोय, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
शेतकऱ्यांशी संवाद
दरम्यान, कृषी सन्मान निधी योजनेचा हप्ता आज ९ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. यावेळी मोदींनी देशातील निवडक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधीचा आठवा हप्त्यांतर्गत साडे नऊ कोटी लाभार्थी शेतकरी कुटुंबांना १९,००० कोटींपेक्षा जास्त रक्कम जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे साडे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होतील. डिसेंबर २०१८ मध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं सुरू केलेल्या या योजनेंतर्गत देशातील लघु व सीमांत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ २ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळतो.