नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये २७ टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. देशात गेल्या २४ तासात २ लाख ४७ हजार ४१७ कोरोना रुग्णांची नोंद झालीय. ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून ५ हजार ४८८ वर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांमध्ये देशभरात २ लाख ४७ हजार ४१७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही संख्या काल आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या २७ टक्के अधिक असल्याचे समोर आले आहे. तसेच, ३८० कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याचे देखील समोर आले असून, आतापर्यंत देशभरात ४,८५,०३५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. याशिवाय ८४ हजार ८२५ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. तर, सध्या अॅक्टिव्ह केसेसची संख्या ११,१७,५३१ वर पोहचली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १३.११ टक्के आहे. याशिवाय, ५ हजार ४८८ ओमायक्रॉन बाधितही आढळून आले आहेत.
ओमिक्रॉन बाधितांची संख्या ५ हजारांच्या पार
देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढली असून ५ हजार ४८८ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील महाराष्ट्रात काल ८६ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय. सर्वाधिक ५४ रुग्णांची पुण्यात नोंद झालीय. महाराष्ट्रात आतापर्यंत १३६७ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय. ७३४ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे
दरम्यान, ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य असली तरी, कोरोनाच्या या उत्परिवर्तित विषाणूचा संसर्ग म्हणजे सर्दीचा आजार नव्हे, हे लक्षात घेऊन लोकांनी दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे, असा इशारा करोना कृती गटाचे प्रमुख व निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील ३०० जिल्ह्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असून संसर्गदरही ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.