हरिद्वार (वृत्तसंस्था) हरिद्वारमध्ये दोन दिवसात एक हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान, उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये महाकुंभ मेळ्यात मंगळवारी कोरोना संक्रमणाचे ५९४ नवीन रुग्ण आढळले आहेत. सोमवारी हरिद्वारमध्ये ४०८ रुग्ण आढळले होते. सध्या हरिद्वारमध्ये २ हजार ८१२ रुग्ण उपचार घेत असून, पहिल्या दोन शाहीस्नान सोहळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
आज बैसाखीच्या मुहूर्तावर हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यातील तिसरं शाही स्नान पार पडतंय. शाहीस्नानासाठी हरिद्वारच्या ‘हर की पौंडी’मध्ये भाविकांनी एकच गर्दी केलेली दिसून येतेय. कोरोनाबाधितांमध्ये अनेक यात्रेकरुंचा आणि साधुसंतांचाही समावेश आहे. कुंभमेळ्यात अनेक धार्मिक संघटनांच्या प्रमुखांनी कोरोना चाचणी करण्यास नकार दिल्याचंही समोर येतंय. मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जुना आखाड्याचे पाच, निरंजनी आखाड्याचे दोन, नाथ आणि अग्नि आखाड्याचे एक-एक साधू कोरोना संक्रमित आढळले आहेत. गेल्या चार दिवसांत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि निरंजनी आखाड्याचे प्रमुख नरेंद्र गिरी यांच्यासहीत १८ साधू कोरोना संक्रमित आढळले. नरेंद्र गिरी यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना हरिद्वारच्या एम्समध्ये हलवण्यात आलं.
याचा परिणाम संपूर्ण देशावरच होणार – अस्लम शेख
सरकार राजकारण करण्यासाठी कुंभमेळा आणि धार्मिक कार्यक्रम घेतंय. याचा विस्फोट होणार आहे. हे कोरोना रुग्ण किती मोठ्या संख्येनं निघणार याची आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही दखल घेतलेली आहे. महाराष्ट्र सरकारलाही याचा विचार करावा लागेल. जेव्हा हे परप्रांतीय मुंबईत येतील, त्याचा परिणाम होईल. त्यामुळे त्याचाही विचार नव्या गाईडलाईन्स तयार करताना केला जाईल. कारण देशात भावूक होऊन काहीतरी करायचं असं सुरू आहे. इतर राज्यात नेते आणि मंत्री वैज्ञानिकांचं ऐकायचं नाही, डॉक्टरांचं ऐकायचं नाही आणि स्वतः मनाने जे काही करत आहे, त्याचा परिणाम संपूर्ण देशावरच होणार आहे,” असा इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कुंभमेळ्याविषयी बोलताना दिलेला आहे.