नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांची सुखरुप सुटका करण्याची मोहीम सुरू आहे. यातच काबुलहून भारतात आणण्यात आलेल्या एकूण ७८ जणांपैकी १६ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. यात अफगाणिस्तानच्या गुरुद्वारांमधून गुरू ग्रंथ साहिब घेऊन भारतात परतलेल्या ३ शिखांचाही समावेश आहे.
संसर्ग झालेल्यांमध्ये तीन ग्रंथींचा देखील समावेश आहे. जे काबूलहून सोबत पवित्र श्री गुरु ग्रंथ साहिबचे तीन सरूप घेऊन आले होते. मंगळवारी सकाळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, परराष्ट्र राज्यमंत्री वी मुरलीधरन आणि भाजपा नेते आरपी सिंह यांनी विमानतळावर गुरु ग्रंथ साहिबचं सरुप घेतलं. यावेळी हे ग्रंथ डोक्यावर घेऊन ते दिल्ली विमानतळावरून बाहेर आले होते. वायु सेनेच्या एका विशेष विमानाने सोमवारी काबूलहून ताजिकिस्तानच्या दुशांबेसाठी उड्डाण घेतले होते. २५ भारतीय नागरिकांसह ७८ प्रवशांना घेऊन, हे विमान मंगळवारी सकाळी दुशांबेहून दिल्लीत दाखल झाले होते.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी काय म्हणाले?
केंद्रीयमंत्री हरदीप पुरी यांनी मंगळवारी सांगितले की, अफगाणिस्तानमधून आतापर्यंत २८८ भारतीय नागरिकांसह ६२६ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांनी हे देखील सांगितलं की, त्यापैकी ७७ अफगाण शीख होते. अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीय नागरिकांच्या संख्येत भारतीय दूतावासात काम करणाऱ्या लोकांचा समावेश नाही.