जळगाव (प्रतिनिधी) कोरोना काळात लॉकडाऊन नियम न पाळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी व युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड.शहेबाज शेख यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील तसेच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ईमेल द्वारे निवेदन पाठवून केली आहे.
मार्च २०२० पासून राज्यात कोरोना महामारीचा प्रभाव सुरु असून यामध्ये लॉकडाऊनमध्ये अनेक विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर भादवी कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे सदर युवकांना पासपोर्ट व नोकरीसाठी अर्ज करतांना चारित्र पडताळणीच्या वेळी फौजदारी गुन्हा प्रलंबित असल्याचे दिसत असल्याने त्यांच्या अनेक शैक्षणिक व शासकीय कामात अडचणी निर्माण होत आहे.
कोरोना ही नैसर्गिक आपत्ती असून या काळात जीवनावश्यक गरजांकरीता घराबाहेर पडलेले तरूण हे निश्चितच सराईत गुन्हेगार किंवा दंगेखोर नाहीत परंतू त्यांना या भयंकर समस्येला सामोरे जाव लागत आहे. राज्यात अशाप्रकारे गुन्हे दाखल झालेले लाखो तरुणांचे भविष्य उध्वस्त होईल की काय ? अशी भितीदायक स्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. राज्य सरकारने सदर विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगार सह नोकरीच्या शोधातील उमेदवारांवर दाखल भादवी कलम १८८, २६९, ३३६ नुसार फौजदारी गुन्हे तात्काळ मागे घेण्याकरीता लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन तसा अध्यादेश काढावा व तरुण पिढीवर गुन्हेगार म्हणून लागलेला डाग पुसुन दिलासा देण्यात यावा अशी मागणी ॲड.शहेबाज शेख यांनी सदर निवेदनाद्वारे केली आहे.