बोदवड (महेंद्र पाटील) पक्षा पेक्षा नेत्यांचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या इर्षेने लढली गेलेली बोदवड कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यावेळी चांगलीच गाजली. लांबत गेलेल्या बाजार समितीच्या निवडणुका अचानक घोषित झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू असतांना विभाजनामुळे स्थगिती अश्या वृत्तामुळे काहीशा गोंधळात पडलेली ही निवडणूक होणार की नाही?, हा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, तसे काही न झाल्याने ही निवडणूक चुरशीने लढवल्या गेली.
गेल्या २० वर्षांपासून आमदार एकनाथ खडसेंचे वर्चस्व असलेली ही संस्था पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी स्वतः खडसे यात जातीने लक्ष घालून होते. यावेळी त्यांचा पक्ष बदलला असला तरी ही निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने लढवली. आ. खडसे भाजपमध्ये असतांना सुद्धा त्यांचेच नेतृत्वाखाली या निवडणुका जिंकल्या होत्या. त्या वेळी सुद्धा त्यांनी त्या वेळच्या पक्षीय युतीस फारसे महत्व दिले नव्हते या वेळी सुद्धा त्यांनी काँग्रेसचे अस्तित्व मतदारसंघात फारसे नसल्याचे दावा करत ‘एकला चलो ची’ भूमिका घेत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यावर काँग्रेस नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. परंतु त्यांनी त्यास महत्व न देता काही काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांना जुजबी महत्व देत प्रचार यंत्रणा राबवली.
दुसरीकडे भाजपने जिल्हा दूध उत्पादक संघात खडसें यांचा पराभव करत त्यांना धक्का दिला होता. मात्र या निवडणुकीत त्यांनी लहान भावाची भूमिका घेत शिंदे गट समर्थक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला व युती केली. सुरवातीला खडसे यांच्या प्रभावामुळे व राष्ट्रवादीची जोड या मुळे ही निवडणूक त्यांना सोपी जाईल असे वाटले होते. कारण त्यांचेकडे अनुभवी कार्यकर्त्यांची एक फळी आहे. उमेदवार निवडतांना सुद्धा आ. खडसे यांनी बऱ्याच नवीन चेहऱ्यांना संधी दिली. तर दुसरीकडे आ.चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांशी समन्वयातून प्रचारमोहिम राबवण्यास सुरवात केली. शिंदे गटाचे कार्यकर्त्यांत उत्साह होताच. शेवटच्या दोन दिवसात मतदारांना आपले कडे वळवण्याचे जोरदार प्रयत्न झाले नातेवाईक मंडळी सुद्धा स्वतंत्रपणे प्रचारात सक्रीय केली गेली पैनलचे सोबत उमेदवार फिरत असले तरी नातलगांनी वैयक्तिक भेटी गाठी घेत आपल्या उमेदवारांना मत मिळवण्यासाठी प्रयत्न केले.
सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघात जास्तीतजास्त उमेदवार कसे निवडून येतील याचा जोरदार प्रयत्न दोनही पैनल कडून झाला. सोसायटी मतदारसंघात खडसेंचे व जुने राष्ट्रवादीचे प्रभाव पूर्वी जास्त असल्यामुळे आ.पाटील यांनी सोसायटी मतदारसंघात मते मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांच्या या मेहनतीला जर यश मिळाले तर निकाल धक्कादायक लागू शकतात. कारण अनेक मतदारांनी त्यांचा कल दिसू दिला नव्हता. प्रचारासाठी आलेल्या प्रत्येक उमेदवारांचा प्रचार त्यांनी ऐकून घेतला होता. ग्रामपंचायत मतदारसंघात आ.पाटील समर्थकांची संख्या वाढली असल्याने त्यात पण अटीतटीच्या लढती होतील. हमाल मापारी व व्यापारी मतदारसंघातसुद्धा एक एक मताची जोडणी करण्यासाठी दोनही पैनलच्या उमेदवारांनी जोरदार प्रयत्न केले.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कडील नाराजांची संख्या तुलनेत जरा जास्त होती. त्यात थोडा जुनी व नवी राष्ट्रवादी हा मुद्दा पुढे येत होता. पण त्यावर बऱ्यापैकी समजूत काढली गेली. ही नाराजी जर दूर झाली असेल तर ती खडसे गटासाठी जमेची बाजू राहणार आहे .काँग्रेसचे अस्तिव जरी खडसे यांनी नाकारले असले तरी त्यांचे जे थोडेफार मतदार असतील त्यांना जर समजावण्यात यश आले नसेल तर अटीतटीच्या परिस्थितीत ही थोडी मते विरोधात जाणे हे राष्ट्रवादीस अडचणीचे ठरू शकते. आमदार खडसे यांना त्यांचे अनेक वर्षांपासून असलेले अबाधित वर्चस्व टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची होती तर आमदार पाटील यांना मतदारसंघात असलेली एका मोठया सहकारी संस्थेत शिरकाव करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची होती. त्यांच्या ज्याही जागा निवडून येतील ते त्यांचे यशच असेल आणि जर परिवर्तन झाले तर हा निकाल मतदारसंघात राजकीय वातावरण आणखी तापवणारा ठरणार आहे.
राजकीय वर्चस्व व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लावून ही निवडणूक ज्या संस्थेसाठी लढवली गेली त्या संस्थेची स्थिती फारशी समाधानकारक नाही. येणाऱ्या संचालक मंडळास ही संस्था तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे लागतील. आता निवडणुकीत जोमाने प्रयत्न करणारे उमेदवार व त्यांचे नेते निवडून आल्यावर बाजार समितीस ऊर्जितावस्था आणण्यासाठी किती जोमाने प्रयत्न करतात हे भविष्यात समजेल.