मुंबई (वृत्तसंस्था) बँकेच्या कर्जामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. यावेळी शेतकऱ्याच्या परिवाराने उपोषणाला बसण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पनवेल तालुक्यातील बँक ऑफ इंडियाच्या आपटा शाखेने फसवणूक केल्याचा आरोप महेंद्र देशमुख यांनी केला आहे. शेतकरी महेंद्र देशमुख यांनी आंदोलनही केलं होतं. या प्रकरणी त्रिसदस्यीय समितीमार्फत आठ दिवसात चौकशी करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी ६ जानेवारीला रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. पण आजपर्यंत कोणीही न्याय दिला नाही. जून महिन्यापासून मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र कोणीही भेट होऊ दिली नाही असाही आरोप महेंद्र देशमुख यांनी केला. महेंद्र देशमुख यांनी तीन मुलींच्या शिक्षणासाठी आणि स्वखर्चासाठी २४ फेब्रुवारी २००६ रोजी ८ लाख ४० हजार एवढी रक्कम फिक्स डिपॉझिट खात्यात जमा केली होती. बँक ऑफ इंडियाच्या आपटा शाखेत त्यांची ही रक्कम जमा होती. १५ मार्च २००८ रोजी महेंद्र देशमुख यांनी १० लाख २० हजार रुपये रक्कम कुटुंबातील सर्वांच्या नावे जमा केली. त्यापूर्वी २००६ आणि २००७ या वर्षाची खात्यातील एकूण जमा रक्कम अंदाजे २३ ते २४ लाखांपर्यंत होती. त्यासाठी त्यांनी स्वतःचे घर तारण ठेवले. त्या घराची रक्कम बँकेने जवळपास ८ लाख ठरवली. त्यानुसार अंदाजे ३२ लाखापर्यंत रक्कम बँकेकडे तारण ठरवण्यात आली. मात्र तरीही ४० लाख तारण मालमत्ता दाखवण्यासाठी ८ लाख कमी पडत होते. त्यामुळे ते प्रकरण बँकेकडे सर्व कागदोपत्री स्थगित राहिले. या सर्व प्रकरणात तारण ठेवलेले जवळपास ३२ लाख रुपये परत मिळू नयेत, यासाठी कर्ज काढण्याआधीच बँकेने तीन कर्ज लेखी पत्र देऊन लादल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.













