धरणगाव (प्रतिनिधी) परप्रांतीयांच्या टोळक्याने एका तरुणाचा खून केल्यानंतर एक मोठी माहिती समोर आली आहे. संबंधित जिनिंग मालकाने किंवा ठेकेदाराने पोलिसांकडे मजुरांची कोणतीही माहिती दिलेली नव्हती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. वास्तविक बघता कायद्यानुसार विहित नमुन्याच्या अर्जात परप्रांतीय मजुरांची माहिती पोलीसानांकडे नोंदविणे बंधनकारक असते. या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे एका मराठी तरुणाचा हकनाक बळी गेला आहे. त्यामुळे जिनिंग मालकासह ठेकेदाराला या गुन्ह्यात सहआरोपी करा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी केली आहे.
नेमकी काय आहे घटना ?
शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री किरकोळ वादातून एका ३० वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये घडल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. कालू सोनवणे (वय 30 रा. दहिवद तांडा, शिरपूर) या तरुणाचा परप्रांतीयांच्या टोळक्याने डोक्यात लाकडी दांडा घालून खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी रात्रभर परिसर पिंजून काढत तब्बल १७ आरोपींना ताब्यात घेतले आहे. परंतू अजूनही तीन-चार आरोपी फरार असून त्यांचा कसून शोध सुरु आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या मागावर आहेत. परंतू जिनिंग मालकासह ठेकेदाराकडे मजूरांबाबत कोणतही माहिती अधिकृत माहिती नसल्यामुळे पोलिसांना तपासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
काय म्हणतो कायदा ?
मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंनी ज्यातील परप्रांतीयांची नोंद करण्याचे पोलीस यंत्रणेला आदेश दिले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सतत परप्रांतीयांची माहिती ठेवण्याची मागणी केली होती. राज्यात परप्रांतीय कोठून येतात, ते कोठे वास्तव करतात याची कोणतीच माहिती नसते. मात्र यासंबंधी पोलीस यंत्रणेकडे रेकॉर्ड असायला हवा. अशी मागणी राज ठाकरे यांनी सतत केली होती. याच पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंनी हा मोठा निर्णय घेतला होता. यानुसार आस्थापना मालक आणि ठेकेदारांनी त्यांच्याकडील सर्व मजुरांची माहिती पोलीस विभागास देणे बंधनकारक आहे. त्या मजुराचे फोटो, पत्ता व सर्व अद्ययावत माहितीचे दस्तावेज ठेवणे आवश्यक आहे. अगदी परप्रांतीयाला घर भाड्याने दिले असेल, तर त्या भाडेकरूची सविस्तर माहिती देखील जवळच्या पोलीस ठाण्यात देणे घरमालकांना कायद्याने बंधनकारक आहे. माहिती न देणाऱ्या घरमालकांवर कारवाईची कायद्यात तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात तसेच राज्य सरकारच्या नियमात परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्याच्या नियमाची तरतूद असून परप्रांतीयांना कामावर ठेवणाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुद्ध देखील कारवाईची तरतूद आहे.
अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन : अॅड. जमील देशपांडे यांचा ईशारा !
जिल्ह्यासह राज्यात गुन्ह्यांचे वाढते प्रमाण कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.केंद्राच्या राज्य स्थलांतर कायद्याअंतर्गत तसेच राज्यातील परप्रांतीय व्यक्तींच्या नोंदी करण्याच्या कायद्याची ठोस अंमलबजावणी व्हावी. तसेच धरणगावच्या प्रकरणात जिनिंग मालकासह ठेकेदाराला या गुन्ह्यात सहआरोपी करावे,अशी आमची मागणी आहे. कारण या प्रकरणात एका मराठी तरुणाचा हकनाक बळी गेला आहे. गुन्हा दाखल न झाल्यास आम्हाला मनसे स्टाईल आंदोलन करावे लागेल, असा ईशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी दिला आहे. तसेच याबाबत लवकरच पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदन दिले जाणार असल्याचेही सांगितले.