नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून यांनी द्रौपदी मुर्मू यांनी आज संसद भवनात शपथ घेतली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्याकडून द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली गेली.
आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. मावळते राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर सव्वा दहा वाजेच्या सुमारास देशाचे सर न्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रि परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू यांचे संपूर्ण कुटुंबदेखील या सोहळ्याला उपस्थित होते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या मोठ्या फरकानं विजयी झाल्या. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या या निवडणुकीत त्यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिंह यांना पराभूत केले.
कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
द्रौपदी मुर्मू या ओडिशातील आदिवासी नेत्या आहेत. ओडिशातील BJP-BJD युती सरकारमध्ये 2002 ते 2004 या काळात त्या मंत्री होत्या. त्यांनी झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून देखील काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणतीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेली नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावा, अशी मागणी केली जात होती. आता द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून ही गोष्ट साध्य झाली आहे.
द्रौपदी मुर्मू यांचे भाषण
आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, अशा निर्णायक क्षणी देशाने माझी राष्ट्रपती म्हणून निवड केली आहे. आजपासून काही दिवसांनी देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. देश स्वातंत्र्याची पन्नास वर्षे साजरे करत असताना माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली हा देखील योगायोग आहे. आज स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी ही नवी जबाबदारी माझ्यावर आली आहे. मी स्वतंत्र भारतात जन्मलेली देशाची पहिली राष्ट्रपती आहे, असं द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतंत्र भारतातील नागरिकांकडून आपल्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या, त्या पूर्ण करण्यासाठी या आपल्याला जलद गतीने काम करायचे आहे. उद्या म्हणजेच २६ जुलैला कारगिल विजय दिवसही आहे. हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयम या दोन्हींचे प्रतीक आहे. आज मी कारगील विजय दिवसानिमित्त देशाच्या सैन्याला आणि देशातील सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा देतो, असंही राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. वैंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रिपरिषदचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि सरकारचे प्रमुख, नागरी आणि लष्करी अधिकारी या समारंभाला उपस्थित होते.