धुळे (प्रतिनिधी) महाराष्ट्रात कोरोना महामारीने अक्षरशः हैदोस घातला आहे. नगरसारख्या शहरात एकाच दिवशी ४९ मृतांना अग्नी द्यावा लागला. स्मशान भूमीत पुरेशी जागा नसल्याने एकाच यावर आठ-दहा प्रेतांचे एकत्रित सरण रचावे लागते. पण याही परिस्थितीत स्मशान भुमीत पडलेल्या प्रेतांच्या खचाचे राजकीय भांडवल म्हणून वापरण्याचा विचार केवळ देवेंद्र फडणवीस आणि त्यासमान बौध्दीक पातळीचे नेतेच करु शकतात, अशी झणझणीत टिका भाजपचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.
आपल्या पत्रकात ते पुढे म्हणतात की, फडणवीसांना सत्ताच्युत करुन स्थापन झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या स्थापना दिवसापासून त्यांनी केवळ टिका करणे, सरकारची चूक असो, नसो रोज उठून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे, मंत्रीमंडळ पाडण्यासाठी राजकीय विधिनिषेध बाजूला ठेऊन अत्यंत नीच दर्जाचे कटकारस्थान करणे. एवढे एकच काम फडणवीस आणि त्यांची टोळी फार हिरीरीने करीत आहे. करोनाच्या अस्मानी संकटाविरुध्द लढण्यासाठी एकमताने निर्णय व्हावा. यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्ष नेत्यांची मते जाणून घेतली. उपाय सुचवावे अशी विनंती केली. उपाय सुचविण्याचे दुरच ! पण मिडीयासमोर मात्र थोबाड वासून, चमकोगिरी करण्यात कुणीही कसर सोडलेली नाही. केलेल्या सूचना बघा. शंभर टक्के लॉकडाऊन नको, मग नेमके काय करायला हवे ? हे कुणीही सुचवलं नाही. लहान व्यापाऱ्यांना संरक्षण द्या ! कर्ज काढा ! पण व्यापाऱ्यांना रोख मदत करा. इटलीने केले, फ्रान्सने केले, ब्रिटनने केले, जर्मनीने केले. हे सांगायचे पण त्या देशातील पंतप्रधानांनी, राष्ट्रध्यक्षांनी देशपातळीवर घोषणा करुन मदत केली आहे. हे मात्र सोयीस्करपणे लपवून ठेवायचे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी व राष्ट्रपतींनी काय मदत केली ? हे जनतेला कळू द्या ना ! संकट काही एकट्या महाराष्ट्रावर आले नाही. पुर्ण देशावर आलेले आहे. शेजारच्या गुजरात राज्यातील सुरत येथे एका दिवसात ७२ करोनाग्रस्तांना एकाच वेळी अग्नी द्यावा लागला. कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांनी परडोई किती रक्कम करोना ग्रस्तांच्या खात्यात वर्ग केली ? याचे आकडेही भाजपाच्या पोपटांनी प्रसिध्द केले असते. तर बरे झाले असते. येऊन जाऊन जनतेचा उद्रेक होईल. अशा धमक्या देवून वातावरण गढूळ करणे, जनतेला धीर न देता घाबरवून सोडणे, सरकार करीत असलेले प्रयत्न हाणून पाडणे हाच एकमेव कार्यक्रम सुरु आहे. आम्ही महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखू, जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून अशी भूमिका घेण्याएवजी उद्रेक होईल, लोक रस्त्यावर येतील असल्या धमक्या देण्यातच भाजपचे नेते धन्यता मानीत आहेत. महाराष्ट्रातील जनता इतकीही दुधखुळी नाही. को, फडणवीस आणि त्यांच्या टोळीचा कावेबाजपणा जनतेच्या लक्षात येत नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाच्या जवळची, परिचयातली, नात्यातली कुठली ना कुठली व्यक्ती कोरोना महामारीने बळी पडली आहे.
आपल्या पत्रकात अनिल गोटे यांनी पुढे म्हटले आहे की, प्रत्येक घटनेचे राजकारण करण्याची घाणरेड्या सवयीने देवेंद्रजींचे व्यक्तीगत वाटोळे तर होईलच. ‘हम तो डूबेंगे सनम, लेकीन तुम्हे भी साथ लेकर डुबरेंगे अशी विरोधी पक्षाची अवस्था आपल्या हेकेखोर व अहंकारी स्वभावामुळे त्यांनी स्वत:च निर्माण केली आहे. महाराष्ट्राला लसी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राकडून रोज किमान पाच लक्ष लसी मिळवून देण्याचे, प्रयत्न करण्याबद्दल आवाक्षर काढायचे नाही. हे राज्यातील भाजपाचे धोरण तर, केंद्र शासन देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी लसी उपलब्ध करुन देण्याएवजी बांगलादेश, नेपाळ इत्यादी देशांना लस पुरवठा करीत आहे. पंतप्रधान आसाम, पश्चिम बंगाल, तामीळनाडू येथील निवडणुकांमधे प्रचारासाठी लक्षावधीच्या संख्येने सभा घेण्यात धन्यता मानीत आहेत दिल्लीतील शेतकरी आंदोलनासाठी त्यांना वेळ नाही. करोना महामारीवर उपाय शोधण्यासाठी वेळ नाही. त्यांना करोना उत्सव साजरा करावासा वाटतो. मेणबत्त्या लावा. कधी टाळ्या पीटा, कधी थाळ्या वाजवा, असले बालीश उद्योग करण्यातच धन्यता मानीत आहेत. महाराष्ट्राला कमी पडत असलेल्या लसी मिळविण्याकरीता, जी.एस.टी. चे राहीलेले ३० हजार कोटी मिळवून देण्याकरिता आम्ही केंद्राकडे जाऊ, असे म्हणणे राहीले तर दुरच ! केंद्रातील सरकारने आपल्या संकुचीतपणाने कळस गाठला आहे. पुणे महापालीकेत भाजपाची सत्ता आहे. म्हणून त्यांना परस्पर लसींचा पुरवठा करणे. राज्यातील रुग्णांची संख्या लक्षात न घेता, आठवडे बाजारात वाटा पध्दतीने भाजी विकणाऱ्या भाजी वालीसारखे वाटे पाडून लसींचे वाटप करणे. हे काही निकोप राज्यकत्त्याचे लक्षण नव्हे ! जनतेतून आज प्रतिक्रीया येणार नाही. उद्रेक वगैरे होणार नाही. पण निवडणुकीच्या कठीण काळात फक्त मतदारांच्या जखमेवरील खपली काढण्याचे निमित्त राहिल. मग कळेल की, जनतेचा जोर का झटका धीरे से कसा लागतो ! असेही पत्रकात अखेरीस म्हटले आहे.