बीड (वृत्तसंस्था) तलावात गेलेल्या जमिनीचा आणि घराचा मावेजा देण्यासाठी बीडच्या भूसंपादन विभागाच्या महिला उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी १० हजारांची लाच मागितली. ही लाच एका निवृत्त मंडळ अधिकाऱ्यामार्फत स्वीकारताना एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी दुपारी तीन वाजता भूसंपादन विभागाच्या कार्यालयात केली.
बीड तालुक्यातील एका गावातील तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेली जमीन व घर हे तलावात गेले होते. त्याचा ५ लाख ३८ हजार ९६५ रूपये एवढा मावेजा मिळावा, यासाठी भूसंपादन विभागाकडे अर्ज केला होता. परंतू उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी हा अर्ज निकाली काढण्यास टाळाटाळ केली. शिवाय १० हजार रुपयांची लाचही मागितली.
यावर पाच दिवसांपूर्वी संबंधिताने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने गुरुवारी दुपारी भूसंपादन विभागाच्या कार्यालयात सापळा लावला. सागरे यांनीच वसूलीसाठी नेमलेला सेवानिवृत्त मंडळ अधिकारी नवनाथ प्रभाकर सरवदे (रा. अंबाजोगाई) याच्याकडे लाच देण्यास सांगितले. लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक राजीव तळेकर, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाब बाचेवाड, सहायक सापळा अधिकारी अमोल धस, श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, भारत गारदे, अंबादास पुरी, स्नेहलकुमार कोरडे, सत्यनारायण खेत्रे आदींनी केली