नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा डिझेल-पेट्रोलच्या दरांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केंद्र सरकारला टोला लगावला. राहुलने लिहिले की, पेट्रोलच्या टाक्या लगेच फुल्ल करून घ्या. मोदी सरकारची ‘इलेक्शन’ ऑफर संपणार आहे.
राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वाराणसी येथील पिंडरा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अजय राय यांच्या प्रचारादरम्यान बोलत असताना राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. “भाजपचे लोक धर्म आणि खोट्या गोष्टींच्या आधारे मतं मागत आहेत. शिवाय भाजपचे लोक संपूर्ण देशात हिंदू धर्मावर बोलत आहेत. हिंदू धर्माचा खरा अर्थ सत्य असा आहे. परंतु, भाजपचे लोक खोट्या गोष्टींच्या आधारे मतं मागत आहेत. पंतप्रधान मोदी हे खोट्या गोष्टींचे संरक्षण करत आहेत. भाजपमधील लोक आपापली खूर्ची वाचवण्यासाठी खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, “मी रामायण आणि महाभारत वाचले आहे. परंतु, त्यामध्ये असे कोठेही लिहिले नाही की, काशीत शिवाच्या दरबारी येऊन खोटे बोला. येथे फक्त धर्माच्या नावावर आणि खोट्या गोष्टींच्या आधारे मतं घेतली जात आहेत. लोकांच्या खात्यात १५ लाख जमा करेन, असे मी कधीच म्हणणार नाही.”
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले, “मोदीजी म्हणतात की, राहुल गांधी परदेशातील आहेत. परंतु, आम्ही उत्तर प्रदेशचे आहोत. आमचे कुटुंब अलाहाबादचे आहे. मी ऐकले आहे की, मोदीजी मगरीशी लढले होते. परंतु, मोदी स्नान करण्यासाठी गंगेत गेले होते त्यावेळी ते पोहत नव्हते.”, अशी मिश्किल टिप्पणी राहुल गांधी यांनी केली.