जळगाव (प्रतिनिधी) एरंडोलजवळ गांजाचा ट्रक पकडल्याचे ट्वीट ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने सकाळी केल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. परंतू हा गांजाने भरलेला ट्रक एरंडोलजवळ नव्हे तर नांदेड जिल्ह्यात पकडण्यात आल्याची माहिती दुपारी एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे. दरम्यान, एएनआयच्या ट्वीटमध्ये चुकून ज्या ठिकाणी ट्रक सापडला, त्याऐवजी ज्या ठिकाणी हा ट्रक जाणार होता म्हणजेच जळगाव जवळील एरंडोलचे नाव टाकले गेल्यामुळे गोंधळ उडाला होता. तर हा ट्रक एरंडोलनंतर महाराष्ट्रात इतर ठिकाणी गांजाचे वितरण करणार असल्याची माहिती काही माध्यमांनी नुकतीच दिली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने सोमवारी सकाळी द्विट केले करत जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ मुंबई एनसीबीच्या पथकाने तब्बल १५०० किलो गांजा पकडल्याची माहिती दिली होती. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे मात्र, अशी कोणतीही कारवाई जळगाव जिल्ह्यात झाली नसल्याची माहिती माध्यमांना दिली. तर दुसरीकडे ‘आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई झालेली आहे परंतु ती मुंबईच्या पथकाने केली असल्याचे नांदेड जिल्ह्यातील नायगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिषेक शिंदे यांनी माध्यमांना सांगितले. तसेच हा गांजा एरंडोल येथे जात असताना रस्त्यातच पथकाने पकडल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली.
नांदेडमध्ये नेमकी काय कारवाई झाली?
मुंबई एनसीबीने नांदेड जिल्ह्यातील नांदेड-हैदराबाद मार्गावर मंजराम (तालुका – नायगाव) येथे कारवाई केली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने विशेष मोहीम राबवत ही कारवाई केली. १५ नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी केलेल्या या कारवाईत एनसीबीने १२ चाकी ट्रक ताब्यात घेतला. यातून एकूण 1127 किलोग्रॅम गांजा जप्त केला. तसेच २ आरोपींना अटक केली. आता आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे, अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिलीय. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील एरंडोलनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर गांजाचे वितरण होणार होते, अशी माहिती आता समोर येत आहे.
ट्रकमधील गांजा नांदेडमधून जळगावला येणार होता
ट्रकमधील हा गांजा नांदेडमधून जळगावला जाणार होता. तिथं यातील काही गांजा देऊन ही गाडी पुढे महाराष्ट्रभरात गांजाचं वितरण करणार होती. ही मुंबई एनसीबीने केलेल्या सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक मानली जात आहे. या प्रकरणी एनसीबीने ९८/२०२१ या क्रमांकाने गुन्हा नोंद केला आहे. हा माल कुणाला पोहचवला जाणार होता याचा तपास सुरू आहे. लवकरच यातील इतर तस्करांनाही अटक केली जाण्याची शक्यता आहे.
एएनआयच्या ट्वीटमुळे कसा उडाला गोंधळ !
दरम्यान, एएनआयच्या ट्वीटमध्ये चुकून ज्या ठिकाणी ट्रक सापडला, त्याऐवजी ज्या ठिकाणी हा ट्रक जाणार होता म्हणजेच जळगाव जवळील एरंडोलचे नाव टाकले गेल्यामुळे गोंधळ उडाला होता. परंतू या ट्रकमधील काही प्रमाणातील गांजा एरंडोल येथे येणार होता, हे आता समोर आले आहे. एरंडोलजवळील वनकोठा येथील एक व्यक्ती हा गांजाचा मोठा तस्कर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘नंदू’ नामक हा व्यक्ती अनेक वर्षापासून हा धंदा करतो, असेही माहिती सूत्रांनी दिलीय.