मुंबई (वृत्तसंस्था) लॉकडाउनच्या बाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यासंबंधी चर्चा नेहमी सुरु असते. निर्बंध अधिक कडक करण्यासंबंधीचं पावलं राज्य शासन उचलणारच आहे. त्यादृष्टीने लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे. तसेच लॉकडाऊन करायचा नसेल तर लोकांनी नियम पाळणं आवश्यक आहे. तसेच नियम पाळा, लॉकडाऊन टाळा हाच एक पर्याय असल्याचं सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला इशारा दिला आहे.
राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. शरद पवारांवर काल यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या पित्ताशय नलिकेत खडे आढळले. त्यामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र, एन्डोस्कोपीद्वारे हे खडे काढण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना आराम वाटत आहे. त्यांचा पोटदुखीचा त्रासही थांबला आहे, असं टोपे यांनी सांगितलं.
दैनंदिन कार्यावर परिणाम नाही
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवारांचा गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. गॉल ब्लॅडर काढल्याने त्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीवर काहीही परिणाम होणार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पोटदुखीचा त्रास वारंवार होऊ नये म्हणून डॉक्टरांनी हा निर्णय घेतला. येत्या ८-१० दिवसांत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा अॅडमिट करण्यात येणार आहे. मात्र, त्यांची प्रकृती आणखी उत्तम वाटली तर लगेच चार-पाच दिवसातही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
बेड्स उपलब्ध नाही अशी परिस्थिती मुंबईत किंवा जिल्ह्यांमध्ये कुठेही नाही. काही ठराविक रुग्णालयात जिथे खूप मागणी असते तिथे अडचणी निर्माण होत आहे. सध्या मुंबईत आयसीयूचे ४०० बेड्स, ऑक्सिजनचे २१६० बेड्स आणि व्हेंटिलेटरचे २१३ बेड्स उपलब्ध आहेत. बेड्स वाढवण्याच्या सूचना सर्व प्रशासनाला देण्यात आल्या आहेत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
मानसिक तयारी ठेवा
लसीकरण वेगाने सुरु असून हर्ड इम्युनिटी आणण्याचा प्रयत्न असून त्यातून रुग्णसंख्या कमी होताना दिसेल,” असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. लॉकडाउनसंबंधी बोलताना ते म्हणाले की, “लॉकडाउनच्या बाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यासंबंधी चर्चा नेहमी सुरु असते. निर्बंध अधिक कडक करण्यासंबंधीचं पावलं राज्य शासन उचलणारच आहे. त्यादृष्टीने लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे. गर्दी टाळावी हाच दृष्टीकोन आहे. गर्दी होणाऱ्या सर्व ठिकाणी कठोर निर्बंध आणण्यासाठी नियोजन करत आहोत. अंतिम झाल्यानंतर त्यानंतर कळवण्यात येईल”.