मुंबई/नवी दिल्ली – जलशक्ती मंत्रालय, जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण विभाग, भारत सरकार यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्याने देशातील सर्वोत्कृष्ट राज्याचा पहिला क्रमांक पटकावला आहे. पाणी संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सन्मान महाराष्ट्र राज्याला जाहीर झाला आहे.
या पुरस्कारात महाराष्ट्रासोबतच नवी मुंबई महानगरपालिका हिने “सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था” या गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर कनिफनाथ जल/पाणी वापर सहकारी संस्था, नाशिक यांनी “सर्वोत्कृष्ट जल/पाणी वापर संस्था ” या श्रेणीत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
याबाबत व्हि.एल. कांन्ता राव, सचिव, केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण विभाग, मंत्रालय, भारत सरकार यांनी राज्याचे मुख्य सचिव श्री आर एस मीना यांना कळविले आहे.
सदर पुरस्कार वितरण समारंभ १८ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात (Vigyan Bhawan) पार पडणार असून, राज्याला ट्रॉफी, प्रशस्तिपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
राज्याच्या जलसंधारण, जलव्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवन क्षेत्रात करण्यात आलेल्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,(तापी विदर्भ व कोकण खोरे विकास महामंडळ) जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील (गोदावरी व मराठवाडा खोरे विकास महामंडळ) तसेच जलसंपदा विभागाचे अभिनंदन केले आहे.
” हा सन्मान राज्यातील पाणी संवर्धन उपक्रमांना नवी ऊर्जा देणारा ठरेल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखालील जलसंपदा विभागाच्या विकासकामांवर राष्ट्रीय सन्मानाची मोहोर लागली आहे”. जलसंपदा मंत्री, गिरीश महाजन.

















