
जळगाव (प्रतिनिधी) – दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघात होणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांना केले.
पवार यांच्या हस्ते सोमवारी (27 जुलै) धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी, अधीक्षक अभियंता सायस दराडे, सहायक महाव्यवस्थापक (मा.सं.) महेश बुरंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार म्हणाले की, महावितरणच्या प्रत्येक तांत्रिक कर्मचाऱ्याचा जीव अनमोल आहे. अपघात झाल्यास कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबाचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने कोणत्याही कामाच्या वेळी सुरक्षा साधने वापरावीत. त्यासाठी सांघिक कार्यालयाने केंद्रीय स्तरावर खरेदी करून सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुरक्षा साहित्य पुरवले आहे. त्याचा उपयोग करा आणि ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी कटिबद्ध राहा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पवार यांनी दोन्ही मंडलातील मानव संसाधन विभागाची सविस्तर आढावा बैठक घेतली. मानव संसाधन विभागाने व्यवस्थापनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तत्परतेने काम करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. यासोबतच कर्मचाऱ्यांचे सर्व प्रलंबित दावे, पदोन्नती पॅनल्स आणि शिस्तभंग कारवाईशी संबंधित प्रकरणांचा निर्धारित वेळेत आणि वेगाने निपटारा करण्याची सूचनाही पवार यांनी आढावा बैठकीत दिली.
बैठकीस कार्यकारी अभियंते अतुल गायधनी, युगलकिशोर प्रसाद, मनीषा कोठारी, प्रताप मचिये, भाऊसाहेब पाटील, प्रीतम काळे, जितेंद्र महाजन, व्यवस्थापक (मा.सं.) नरेश प्रसाद, राजेंद्र गोसावी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
















