
जळगाव (प्रतिनिधी) : भाजप जळगाव ग्रामीण महिला मोर्चाच्या वतीने लाडके नेते देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘कृषी माऊली सोहळा’ भावरखेड येथे उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमात शेतकरी महिलांना सेंद्रिय शेती, भाजीपाला लागवड आणि आत्मनिर्भरतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश प्रभारी सौ. देवयानीताई बडगुजर होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अॅड. सौ. कृतिकाताई आफ्रे, भाजप नेते भगवानभाऊ महाजन, मंडलाध्यक्ष दिनेशभाऊ पाटील, संजय महाजन, किसान मोर्चाचे अध्यक्ष जिजाबराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना, “जशी रखुमाई विठ्ठलाच्या प्रत्येक पावलावर साथ देत होती, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील शेतकरी विठ्ठलाला शेतीत खांद्याला खांदा लावून साथ द्या,” असे भावनिक आवाहन करण्यात आले. महिलांनी शेतीत सक्रिय सहभाग घेतल्यास कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात भावरखेड गावातील मोठ्या संख्येने शेतकरी महिलांनी सहभाग घेतला. सुपीक मातीचे संवर्धन, शेतीचे आधुनिक व्यवस्थापन, मधल्या पिकाच्या स्वरूपात भाजीपाला लागवड करून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच सेंद्रिय शेतीद्वारे उत्पादित भाजीपाल्याचे आरोग्यदायी फायदेही महिलांना समजावून सांगण्यात आले. यामुळे महिलांमध्ये आत्मनिर्भरतेची प्रेरणा निर्माण झाली.
यावेळी उपस्थित महिलांनी लाडके नेते देवाभाऊ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद व्यक्त केले.
कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरीताई अत्तरदे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष सौ. रेखाताई पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्या कुंजल भाटिया, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रमीलताई रोकडे, नगरसेवक, नगरसेविका तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन चंदनभाऊ पाटील आणि गुलाबभाऊ मराठे यांनी केले.
















