धरणगाव (प्रतिनिधी) माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. फोनवरून गुलाबराव पाटील यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी बोलावणे आल्याचे कळते.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी जाऊन बैठक घेतली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात जवळपास पावणे दोन तास चर्चा झाली आहे. उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबाबत त्यांच्यात झाल्याची माहिती मिळत आहे. उद्या सकाळी ११ वाजता पहिल्या टप्प्यात काही मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या मंत्रिमंडळात 60 टक्के नवे चेहरे आणि 40 टक्के अनुभवी नेते या विस्तारात असण्याची शक्यता आहे. आशिष शेलार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर यांचा मंत्रिमंडळात समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. शिंदे गटाच्या यादीत गुलाबराव पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, दुपारी मुंबईहून फोन आल्यानंतर गुलाबराव पाटील तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे कळतेय. एवढेच नव्हे तर त्यांना पुन्हा एकदा पाणी पुरवठा खाते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आगे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून सहा आणि भाजपाकडून सहा अशा बाराजणांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांमध्ये धाकधूक आहे. अद्याप अधिकृतपणे कोणालाही फोन किंवा निरोप आलेला नाही. प्रत्येकजण आपल्याला फोन येऊ शकतो या आशेने फोनची वाट पाहत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून कोण शपथ घेणार ही नावे साधारणे स्पष्ट झाली आहेत. मात्र भाजपाकडून कोणतेही नाव कुणीही खात्रीने सांगत नाही.